मुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वीच धरणे रिकामी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST2021-06-01T04:17:07+5:302021-06-01T04:17:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापूर आल्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांत कमीत कमी ४ ते ५ हजार ...

Empty the dam before the torrential rains begin | मुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वीच धरणे रिकामी करा

मुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वीच धरणे रिकामी करा

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापूर आल्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांत कमीत कमी ४ ते ५ हजार कोटींचा फटका बसतो. यामुळे पूरस्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तिन्ही जिल्ह्यांतील धरणांतील धोका पत्करून पाण्याचा विसर्ग करून पूर नियंत्रणात ठेवण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संभाव्य पूरनियंत्रण पूर्वतयारी बैठकीत हा निर्णय झाला. जलसंपदामंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री जयंत पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते. तिन्ही जिल्ह्यांतील आमदार, खासदार ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले.

जयंत पाटील म्हणाले, मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर एकाचवेळी सर्व धरणांतील पाणी सोडले जाते. परिणामी पूरस्थितीत भर पडते. महापुराचा धोका निर्माण होतो. यामुळे हा धोका टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने धरणातील पाण्याचे व्यवस्थापन करावे. हवामान आणि पाऊस याचा अभ्यास करून धरणांमधील पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करावे. मुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वीच धरणे रिकामी करावीत. महापूर आल्यानंतर किती गावांतील किती लोकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे, त्याचे नियोजन केले आहे; पण पूरस्थितीच निर्माण होणार नाही, यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धोका पत्करून धरणातील पाण्याचे नियोजन करावे.

पाटबंधारे विभागाचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांनी पूर नियंत्रणासाठी केलेल्या सर्व उपायांची माहिती दिली. ते म्हणाले, कृष्णा खोऱ्यातील नद्यांची पाणीपातळी पावसाळ्यात त्या-त्या वेळी नेमकेपणाने कळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान बसवण्यात येईल. याद्वारे रियल टाईम डाटा ॲनॅलेसिस सिस्टिम आणि रियल टाईम डिसिजन सपोर्ट सिस्टिम कार्यान्वित करण्यात येईल. यामुळे नद्यांमधील पाणी पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

-------------------------

कर्नाटकात मोठे नुकसान

गेल्यावर्षी पूर टाळण्यासाठी कर्नाटक सरकारशी समन्वय ठेवून अलमट्टीचा विसर्ग ५ लाख क्यूसेकपर्यंत वाढवला. यामुळे अलमट्टी धरणाच्या खालील बाजूस पूरस्थिती गंभीर झाली. तेथील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे. हाही मुद्दा या वेळी विचारात घ्यावा, अशी सूचना जलसंपदामंत्री पाटील यांनी दिली.

-------------------------

रेड झोनमधील अतिक्रमण पूरस्थितीला कारणीभूत : जयंत पाटील

नंदकुमार वडनेरे समितीने पूरस्थितीला रेड झोनमधील अतिक्रमण जबाबदार धरले असून, ती वस्तुस्थिती आहे. ही सगळीच अतिक्रमणे आता काढणेही शक्य नाही. ज्या ठिकाणी नदी, नाले व ओेढ्यांच्या पात्रांमध्येच गंभीर अतिक्रमण झाले आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात मर्यादेपेक्षा जास्त पाऊस होऊन पूरस्थितीची शक्यता दिसून आली की, येथील धरणातील पाण्याचा विसर्ग व त्याच प्रमाणात अलमट्टीतील विसर्ग सुरू करण्यासाठी कर्नाटक सरकारसोबत नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Empty the dam before the torrential rains begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.