विद्युत खांब धोकादायक
By Admin | Updated: July 18, 2014 23:25 IST2014-07-18T23:21:25+5:302014-07-18T23:25:38+5:30
जयसिंगपूरच्या शाहूनगरमधील स्थिती : भररस्त्यात अडथळे, अपघातास निमंत्रण

विद्युत खांब धोकादायक
संदीप बावचे -जयसिंगपूर
लोकसंख्या वाढली, वाहनं वाढली, पण रस्ते तेवढेच राहिल्याने रस्त्याचा श्वास घुसमटला. यातच आणखी एक विचित्र अडथळा शहरातील शाहूनगर भागामध्ये समोर येत आहे. विजेचे तब्बल बारा खांब रस्त्याच्या मधेच उभे आहेत. हे खांब काढून भूमिगत वीजवाहिनी टाकण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र, ती रखडली असून विजेचे हे खांब एका बाजूस हलविण्याशिवाय कोणताही पर्याय सध्या नसल्याची बाब पुढे आली आहे. मात्र, हे खांब धोकादायक ठरत आहेत.
शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून मुख्य दोन रस्त्याचे जोडरस्ते अधिक प्रमाणात उपयोगात आले आहेत. मात्र, शाहूनगर परिसरातील पटेल चौकातून जाणारा रस्ता सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या रस्त्याचे डांबरीकरण झाले; परंतु जुन्या खांबांनी आपली जागा सोडली नाही. रस्त्याची रुंदी अपुरी आहे. पटेल चौक ते नऊ नंबर शाळेकडे जाणाऱ्या या रस्त्यावर तब्बल बारा विजेचे खांब आहेत.
अरुंद रस्त्यामुळे या मार्गावर विद्युत खांबाला डंपरने धडक दिल्यामुळे खांब कोसळण्याच्या घटना अनकेवेळा घडल्या असून काही खांब काहीसे वाकलेदेखील आहेत. रस्त्यात अडथळा ठरणारे हे खांब काढून ‘भूमिगत वीज प्रकल्प’ यामध्ये या रस्त्यावरील वीज खांबांचा समावेश करण्यात आला होता.
मात्र, ठेका मिळालेल्या कंपनीकडून या मार्गावरील वीजवाहिनी हलविण्याबाबतची प्रक्रिया वगळण्यात आल्याचे समजते. रात्रीच्या वेळी फसगत होऊन अपघातास निमंत्रण देणारे हे खांब काढण्याबाबत येथील नागरिकांची मानसिकता दिसत नाही. रस्त्याच्या मधोमध असणारे हे खांब एका बाजूला करण्याबाबत वीज कंपनी विभागाकडून येथील नागरिकांना सांगण्यात आले आहे. मात्र, हे खांब आपल्या बाजूला नकोतश, अशीही मानसिकता नागरिकांची आहे. एकूणच अपघातास निमंत्रण देणारे हे विद्युत खांब हलविण्याची गरज आहे.
या प्रश्नी महावितरणशी संपर्क साधला असता शाहूनगर परिसरातील विद्युत खांब हलविण्यासाठी महावितरण विभाग तयार आहे. येथील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन खांब हलविण्याबाबत नागरिकांशी चर्चा करावी. महावितरणकडून कार्यवाही केली जाईल, अशी माहिती वीज वितरणचे अधिकारी विजय आडके यांनी दिली.
खांब हलविण्याची गरज
सध्या अस्तित्वात असणारे हे खांब अत्यंत धोकादायक बनले आहेत. वाढती लोकसंख्या याचा विचार आणि खासकरून या भागात डंपर व्यावसायिक वास्तव्यास आहेत. अपघातास धोकादायक असलेले विद्युत खांब वातुकीस अडथळा ठरत असल्याने एका बाजूला खांब घेण्याशिवाय पर्याय नाही. - अस्लम फरास, नगरसेवक जयसिंगपूर