बालिंगा उपसा केंद्र सुरू करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:24 IST2021-07-27T04:24:46+5:302021-07-27T04:24:46+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई दूर करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. पुराच्या पाण्यात ...

बालिंगा उपसा केंद्र सुरू करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाई दूर करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या मोटार बाहेर काढून आवश्यक त्या दुरुस्तीसह बालिंका उपसा केंद्र सुरू करण्यास प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून, सोमवारी रात्रीपर्यंत उपसा केंद्र सुरू करण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, शहराच्या विविध भागात महानगरपालिकेच्या ६० टँकरसह खासगी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून सुमारे १५० टँकरच्या माध्यमातून शहरातील नागरिकांची पाण्याची गरज भागविण्याचे प्रयत्न होत आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेकडे रविवारपर्यंत २९ टँकर होते, त्यातून पाणी देण्यात येत होते. सांगली, सातारा, सोलापूर येथून भाड्याने आणलेले टँकर शिरोली फाट्यावर अडकून पडले होते. सोमवारी दुपारी यातील ३५ टँकर महापालिकेच्या सेवेत दाखल झाले. पुणे व मुंबई महानगरपालिकेचे १७ टँकरसुद्धा पोहोचले आहेत. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी त्याचे प्रत्येक प्रभागनिहाय वाटप सुरू केले आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची जबाबदारी निखिल मोरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सोमवारी प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी टँकर वाटपचा आढावा घेतला.
भीषण पाणी टंचाईच्या काळात सामाजिक कार्यकर्ते, भावी नगरसेवक नागरिकांच्या मदतीला धावून आले आहेत. कार्यकर्त्यांनी जवळपास साठ ते सत्तर टँकर भाड्याने आणले असून, त्याद्वारे आपापल्या भागात पाणी पुरवठा करीत आहेत. महापालिका प्रशासनास त्याची खूप मदत झाली. टँकरवर पाणी घेण्यासाठी शहरात सर्वत्र गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. नागरिक काही खासगी कुपनलिकेवरूनही पाणी घेत आहेत. रंकाळा तलावातील पाणी घेण्यासाठीही टँकरचालक जात आहेत.
बालिंगा रात्री सुरू होणार?
बालिंगा जलशुद्धीकरणाकडील उपसा केंद्र सोमवारी मध्यरात्री सुरू होण्याची शक्यता आहे. रविवारी पुराच्या पाण्यात जाऊन कर्मचाऱ्यांनी तेथील मोटारी बाहेर आणल्या. शिरोली एमआयडीसीमध्ये त्याची दुरुस्ती रात्रंदिवस करण्यात येत होती. रात्री आठ वाजेपर्यंत मोटारी मिळाल्या की त्या जोडायला घेतल्या जाणार आहेत. मध्यरात्रीपासून हे उपसा केंद्र सुरू होईल, असे हायड्रोलिक अभियंता जयेश कदम यांनी सांगितले. बालिंगा सुरू झाल्यानंतर ए, बी, सी व डी भागात रोज एकदिवस आड पुरेशा दाबाने पुरवठा केला जाऊ शकतो. निम्म्या शहराचा पाणी पुरवठा सुरू झाल्यास टँकरवरील ताणदेखील कमी होऊ शकतो.