शाळांतून संकलित होणारा 'ई कचरा'
By Admin | Updated: December 17, 2014 23:58 IST2014-12-17T23:21:01+5:302014-12-17T23:58:44+5:30
‘रोटरी क्लब आॅफ करवीर’चा उपक्रम

शाळांतून संकलित होणारा 'ई कचरा'
कोल्हापूर : जागतिक पातळीवर ई कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, त्याबाबत समाजात जागृती निर्माण करण्याच्या हेतूने येथील रोटरी क्लब आॅफ करवीरच्यावतीने २० डिसेंबर व २३ जुलै अशा दोन दिवशी ‘ई कचरा संकलन’ उपक्रम आयोजित करण्यात आला असून, या उपक्रमात शहरातील २३३ शाळांतील हजारो विद्यार्थी सहभागी होत असल्याची माहिती रोटरी करवीरचे अध्यक्ष हरेश पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितली.
ई कचरा ठेवायला जागा मिळत नाही, या वस्तू दररोजच्या कचऱ्यात सापडतात. ओल्या कचऱ्यात अशा वस्तू मिसळल्यामुळे त्याचा मानवी शरीरावर परिणाम होतो. ई कचरा जळून किंवा जमिनीत पुरूनही नष्ट होत नाहीत. त्या उघड्यावरही टाकून चालत नाही. ई कचऱ्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. त्यासाठी समाजात जागृती करण्याच्या हेतूने २० डिसेंबरला संत गाडगेबाबा पुण्यतिथीदिनी तर २३ जुलै ‘वनसंवर्धन दिन’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहरातील महानगरपालिका, खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घर, परिसरातील ई कचरा आणून तो शाळेत जमा करायचा आहे. शाळांमध्ये ‘रोटरी’तर्फे मोठ्या आकाराची पितळी पिशव्या देण्यात येणार असून, त्या पिशवीत ई-कचरा टाकायचा आहे. हा कचरा त्याच दिवशी सायंकाळपर्यंत एका ठिकाणी संकलित करून ठेवला जाईल नंतर तो टेंडर काढून विकण्यात येणार असल्याचे एस. एन. पाटील यांनी सांगितले.
पर्यावरणसंबंधित या उपक्रमात भाग घेऊन जास्तीत जास्त ई कचरा संकलित करणाऱ्या शाळेस रोटरी ‘आंतरराष्ट्रीय कम्युनिटी सर्व्हिस अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमास महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ , जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग यांचे सहकार्य मिळाले असून ‘रोटरी’चे १२० स्वयंसेवक त्यात भाग घेणार आहेत. यावेळी प्रमोद चौगले यांनी उपक्रमाबाबत प्रेझेंटेशन दिले. (प्रतिनिधी)