रिक्त पदांमुळे दप्तर दिरंगाई
By Admin | Updated: August 20, 2015 22:58 IST2015-08-20T22:58:51+5:302015-08-20T22:58:51+5:30
भुदरगड तालुका : भूमी अभिलेखमधील नऊ पदे रिक्त

रिक्त पदांमुळे दप्तर दिरंगाई
शिवाजी सावंत- गारगोटी
भुदरगड तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील सोळा पदांपैकी नऊ पदे रिक्त असल्याने कार्यालयातील कामांमध्ये कमालीची दप्तर दिरंगाई आली आहे. या कार्यालयात कामांसाठी येणाऱ्या गरजू व्यक्तींना मेरा नंबर कब आएगा? म्हणत चप्पल झिजवावी लागत आहेत. त्यामुळे ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारबाबत तीव्र असंतोष पसरत आहे.
संपूर्ण तालुका डोंगरदरीने वेढलेला आहे. त्यामुळे लागवडीखालील जमिनीचे क्षेत्र तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. त्यात लोकसंख्येत वाढ झाल्याने जमिनीत हिस्सेदार वाढले. भावा-भावांच्या जमिनी विभागल्या गेल्या. सात-बारावर हिस्से बरोबर केले गेले; पण प्रत्यक्षात जमिनी न मोजता वाटण्या झाल्या. आता सर्वच शेतकरी सुशिक्षित असल्याने त्यांना जमिनीबाबत जागरूकता आली. त्यांना आपली जमीन मोजून सात-बारावरील क्षेत्राप्रमाणे हवी आहे. त्याच्या नकला, नकाशे, ही कागदपत्रे अद्ययावत हवी आहेत. याव्यतिरिक्त ज्या-ज्या गावांचा सिटी सर्व्हे झाला आहे, त्यांना घराच्या इमारतींसह रिकाम्या जागेचे नकाशे, मोजणी करून हवी आहे, असे सर्व गरजू तालुक्यातील नगर भूमापन अर्थात भूमी अभिलेख कार्यालयाकडे हव्या असणाऱ्या कागदपत्रांची मागणी करतात. याशिवाय कब्जेपट्टी, नवीन सात-बारा तयार करणे, घरांच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी प्रॉपर्टी कार्डावर करण्यासाठीच्या आवश्यकतेमुळे नोंद होण्याकरिता काहीजण अर्ज करीत असतात. अशा या कामांकरिता कार्यालयाची गरज ओळखून एक आॅक्टोबर १९९४ ला या कार्यालयाची स्थापना गारगोटी येथे झाली. स्थापना करताना आवश्यकतेनुसार पद निश्चिती झाली, पण यानंतर कधीही अवलोकन झाले नाही. सर्व्हेअरांची गरज वाढत गेली; पण पदे दोनच राहिली. परिणामी, कामाचा बोजा वाढत जात आहे.
या कार्यालयातील आवक- जावक लिपिक पद १ जून २०१० पासून म्हणजे गेली पाच वर्षे रिक्त आहे. शिपाई पद १६ जून २०१२ पासून, नगर भूकरमापन लिपिक एक पद १० जून २०१३, दुरुस्ती लिपिक १० जून २०१३, लिपिक, कनिष्ठ लिपिक व अभिलेखपाल ही तिन्ही पदे ४ जून २०१५ पासून, याचवेळी उपअधीक्षक यांचीही बदली झाल्याने कार्यालयातील मुख्यपद रिक्त आहे. त्यामुळे संपूर्ण कार्यालय हे मुख्यालय सहायक महाजन यांना सांभाळावे लागत आहे. दोन भूकरमापक आहेत; पण त्यातील एक आजारी रजेवर जाणार आहेत, तर एक प्रकृती अस्वास्थ्यामुळे मोजणी करण्यास असमर्थ आहेत. ही महत्त्वाची पदे तातडीने वाढवून योग्य तो निपटारा होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हा भूकरमापक अधीक्षक सतीश भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या बाबतीतील गांभीर्य मी वरिष्ठांकडे वेळोवेळी व्यक्त केले आहे. ते योग्य ती कार्यवाही करतील.
भुदरगड तालुक्यावर नेहमीच शासन व प्रशासनाकडून अन्याय करण्यात आला आहे. याबाबत आमदार प्रकाश आबिटकर हे लवकरच उपाय योजनेसाठी हालचाली करतील, असा विश्वास शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला.
तातडीने पदे भरण्याची मागणी
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा असणारा हा विभाग शासनाने पदे भरून सुसज्ज ठेवणे आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांची हद्द व क्षेत्रावरून भांडणतंटे होतात, खून, मारामाऱ्या होतात. हे सर्व कमी करण्यासाठी तंटामुक्त अभियान यशस्वी होण्याकरिता ही कार्यालयातील पदे भरा म्हणजे वाद कमी होतील. सोळापैकी नऊ पदे रिक्त आहेत, ती तातडीने भरावीत व लोकांचे होणारे हाल कमी करावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.