संप, मंदी, तणावाने वस्त्रनगरीला ग्रासले

By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T00:07:32+5:302015-07-25T01:13:30+5:30

कुठे आहेत नेते : सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न

Due to depression, depression, stress, garment sector | संप, मंदी, तणावाने वस्त्रनगरीला ग्रासले

संप, मंदी, तणावाने वस्त्रनगरीला ग्रासले

इचलकरंजी : कामगारांचा संप, वस्त्रोद्योगात आलेली मंदी, वारंवार निर्माण होणाऱ्या तणावामुळे संवेदनशील शहर म्हणून होणारा लौकिक यामुळे वस्त्रनगरीची प्रगती व विकास खुंटत आहे. अशा स्थितीत शहराचे पुढारीपण करणारे नेतृत्व कुठे आहे, असा प्रश्न उद्योजक, व्यापारी व सर्वसामान्यांना पडला आहे.इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला शंभराहून अधिक वर्षांची परंपरा असून, येथील कारखानदार व कामगार यांच्या सलोख्याच्या वातावरणामुळे येथील उद्योग-धंद्याची प्रगती झाली. कामगारांना मिळणाऱ्या वेतनात वाढ व्हावी, यासाठी इचलकरंजीत अनेकवेळा आंदोलने झाली. मेळावे, सभा, मोर्चे, धरणे, उपोषण असे अनेकविध प्रकार आंदोलनात अवलंबले गेले; पण त्यावेळच्या कामगार नेत्यांना आंदोलनाची योग्य वेळ जशी समजत होती, तशी आंदोलन तुटेपर्यंत कधीही ताणले गेले नाही. त्यामुळे कॉ. के. एल. मलाबादे यांच्यासारख्या कामगार नेतृत्वाची अद्याप आठवण निघते. तसेच आपल्याला मिळणाऱ्या चार पैशांतील दोन पैसे कामगाराला देण्याची येथील यंत्रमाग कारखानदारांतही प्रवृत्ती आहे.
वस्त्रोद्योगात येणारी मंदी वस्त्रनगरीला काही नवीन नाही. मात्र, त्या-त्यावेळी शासनाशी लढा देऊन काही सवलती मिळवत मंदीवर मात करण्याचे बळ त्यावेळी दाखविले गेले. सन २००० नंतर आलेल्या अभूतपूर्व मंदीच्या काळात तत्कालीन आवाडे समितीने वस्त्रोद्योगासाठी २३ कलमी पॅकेजची शिफारस केली आणि शासनाने स्वीकारली, तेव्हा मंदीवर मात तर केलीच; पण यंत्रमाग उद्योगाने त्यातून प्रगती साधली. आता एकूणच वस्त्रोद्योग मंदीच्या संक्रमणात सापडला आहे. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी कुणाकडे पाहावे, अशी स्थिती उद्योग-व्यापारी आणि व्यावसायिकांची झाली आहे.
अलीकडील काळात सन २००९ पासून शहरात वारंवार तणाव निर्माण होताना दिसतो आहे. सण, उत्सव, देशात कोठेही होणाऱ्या घातपाताच्या घटना किंवा दंगली यामुळे शहरात तणाव निर्माण होतोय. फलक लागणे किंवा पताका बांधणे यासारख्या किरकोळ घटनाही तणावाला कारणीभूत ठरत आहेत. ज्या परिसरात अशी घटना घडेल, तेथील दुकाने पटापट बंद होतात, नागरिकांत भीतीचे वातावरण पसरते. उद्योग-व्यावसायिकांना वित्त-जीविताची भीती वाटू लागते. अशावेळी अगदी गल्लीबोळांतून ते शहराचे पुढारीपण करणारे नेते कुठे गायब होतात, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावतो आहे. (प्रतिनिधी)

मोठे उद्योजक येत नाहीत
इचलकरंजीमध्ये वारंवार होणारे संप आणि तणावाच्या घटना यामुळे गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत शहर व परिसरामध्ये कोणताही मोठा उद्योग आलेला नाही. स्थानिक फाळकूटदादा व स्वत:ला कामगार पुढारी म्हणवून घेणाऱ्यांच्या सतावण्याच्या प्रवृत्तीला कंटाळून बीआरएफएलसारखा बडा उद्योग येथून निघून गेला. वास्तविक पाहता गारमेंट, रेडीमेड आणि प्रोसेसिंग उद्योगामधील मोठे कारखाने उभ्या राहण्यासारख्या पायाभूत सुविधा या परिसरात असतानाही मोठे उद्योजक येथे यायचे धाडस दाखवीत नाहीत, याचाही विचार नेतेमंडळींबरोबरच राजकीय व कामगार क्षेत्रातील पुढाऱ्यांनी करावा, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे.

Web Title: Due to depression, depression, stress, garment sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.