आजऱ्यात नळाला चक्क गटारीचे पाणी
By Admin | Updated: December 19, 2014 00:13 IST2014-12-19T00:02:35+5:302014-12-19T00:13:12+5:30
आरोग्याचा प्रश्न गंभीर : सांडपाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, गटारी तुंबल्या; तक्रारींकडे दुर्लक्ष

आजऱ्यात नळाला चक्क गटारीचे पाणी
ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -निर्मल ग्राम म्हणून शासनाचा पुरस्कार पटकाविलेल्या आजरा शहरामध्ये ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेतून काही भागात चक्क गटारींचे पाणी येत असल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन नसल्याने ठिकठिकाणी असे प्रकार वारंवार घडत आहेत.
चार वर्षांपूर्वी शहरात घिसाडघाई करून अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गटारी बांधण्यात आल्या. गरजेपेक्षा अधिक खोलीच्या या गटारींची सफाई करताना कामगार वर्गावर मर्यादा येत आहेत, तर काही ठिकाणी गटारींमध्ये माती व अन्य साहित्य पडून त्या मुजल्या आहेत. विशेषत: चाफे गल्ली परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चावीच्या पाण्यातून गटारींचे पाणी येत आहे. मुळात या भागातील गटारींच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणताच पर्याय अवलंबलेला नसल्याने गटारींचे पाणी तुंबून पाणीपुरवठा योजनेच्या पाईपमध्ये मिसळत आहे.
या प्रकाराबाबत ग्रामस्थांकडून वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार केली जात असतानाही अद्याप हा प्रकार बंद झालेला नाही.
डेंग्यूसारखा आजार शहरात फैलावू नये, यासाठी धूर फवारणी यंत्रासारखा प्रकार ग्रामपंचायतीमार्फत अवलंबला जात असताना दुसरीकडे भरवस्तीत सांडपाण्याचे साचलेले डबके, चावीतून येणारे दूषित पाणी असा विरोधाभास दिसत आहे. ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन प्रथम सांडपाणी पुढे नेण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना व त्याचबरोबर तातडीने योग्य ते उपाय करून स्वच्छ पाणी पुरविण्याची गरज आहे.
सहनशीलतेचा अंत पाहू नये : ग्रामस्थ
अक्षरश: गटारींमधील पाणी चावीतून येत आहे. पाणी पिण्याकरिता योग्य नाहीच; पण घरखर्चाला वापरतानाही पाण्याला घाण वास येणे, अंगाला खाज सुटणे, अंगावर पुरळ येणे असे प्रकार घडत आहेत. विनंत्या करून झाल्या, आता ग्रामपंचायतीने सहनशीलतेचा अंत पाहू नये,
असे निवेदन राजू लिचम, गोपाळ पाटील, सुरेश पाटील, शिवाजी मनगुतकर यांनी दिले आहे.
भरवस्तीतील पाणी निचरा होण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न सुरू आहेत; परंतु खासगी शेतजमिनीतून पाणी नेण्यास शेतकरी वर्गाचा विरोध असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. जोपर्यंत गटारींच्या पाण्याचा निचरा होत नाही, तोपर्यंत पाणीपुरवठ्याची गळती शोधणे अवघड आहे. - मैमुनबी पठाण, सरपंच आजरा.