सोयाबीनच्या दराचे वांदे, विक्रीची घाई नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST2021-09-22T04:27:52+5:302021-09-22T04:27:52+5:30
नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकऱ्यांचे सोयाबीन आल्या आल्या लगेच व्यापाऱ्यांकडून दर पाडणे सुरु झाले आहे. ...

सोयाबीनच्या दराचे वांदे, विक्रीची घाई नको
नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकऱ्यांचे सोयाबीन आल्या आल्या लगेच व्यापाऱ्यांकडून दर पाडणे सुरु झाले आहे. मागील आठवड्यात ९ हजार क्विंटलवर गेलेला दर या आठवड्याची सुरुवात होताच एकदम साडेपाच हजारापर्यंत खाली आल्याने उत्पादक हबकले आहेत. पण एकूणच आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या इंदूरमधील दर पाहता सोयाबीनचे भाव ६५०० रुपयांच्या खाली येणार नाहीत, त्यामुळे उत्पादकांनी दर पाडण्याच्या व्यापाऱ्यांच्या प्रवृत्तीला बळी न पडता विक्रीची घाई टाळायला हवी.
यावर्षी सोयाबीनच्या दराने ऐतिहासिक उसळी घेतली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उत्पादनात झालेली घट आणि कोरोनामुळे सोया प्रॉडक्टची मागणी वाढल्याचा हा परिणाम आहे. त्याचमुळे कृषी मूल्य आयोगाने ठरवून दिलेल्या ३९०० रुपये क्विंटल या हमीभावापेक्षा जास्त भाव मिळू लागला आहे. मार्चमध्ये ४३०० रुपये असणारा दर आता सप्टेंबरची सुरुवात झाल्यावर तब्बल ११ हजारांवर गेला. पण यातील आर्द्रता, बारदान, काडीकचरा असे नियम लावून प्रतवारीनुसार ८ ते ९ हजार रुपये क्विंटल असा दर मिळू लागला. पण आता ऊन पडल्याने सोयाबीन कापणीला वेग आला आहे. एकदमच माल बाजारात येत असल्याने व्यापाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे दर पाडण्याचे कारस्थान सुरू केले आहे.
तथापि सोयाबीनचे देशातंर्गत भाव ठरणाऱ्या इंदूर येथील केंद्रावर या वर्षी ६५०० रुपयांच्या खाली सोयाबीनचा दर येणार नाही, असे जाहीर करण्यात आले आहे. सोया प्रॉडक्टची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त आहे. मागणीपेक्षा उत्पादन २० ते ३० टक्क्यांनी कमीच झाले आहे, त्यामुळे हा किमान दर बाजारात टिकून राहणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना भीती घालून सोयाबीन खरेदी करुन साठेबाजी करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. आता प्रतवारीनुसार साडेपाच हजारांपर्यंत दर दिला जात आहे. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांचा हा कावा लक्षात घेऊन स्वत:च साठवणूक करुन ठेवावी, बाजारात दरात आणखी वाढ होणार असल्याचे या क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे.
चौकट
दरात मिळवले, मजुरीत घालवले
सोयाबीनचे दर मागच्या वर्षीच्या तुलनेत दीड ते दोन पटीने वाढल्याने त्याच्या मळणी व मजुरीच्या खर्चातही वाढ झाली आहे. मळणीचा क्विंटलचा दर ३५० रुपये झाला आहे, तर मजुरीचा दर प्रती मजूर दोनशे ते तीनशे रुपये झाला आहे. या वर्षी महापूर, अतिवृष्टी आणि त्यानंतर पावसाने घेतलेल्या उघडीपीमुळे आधीच सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यातच मळणीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांची अवस्था दरात मिळवले आणि मजुरीत घालवले अशी झाली आहे.