शेतकऱ्यांचा संयम सुटू देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:11+5:302020-12-13T04:39:11+5:30
जयसिंगपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळे देश अशांत झाल्याशिवाय राहणार नाही. ...

शेतकऱ्यांचा संयम सुटू देऊ नका
जयसिंगपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळे देश अशांत झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा देश अशांत झाला तर कोणालाही कारभार करता येणे अवघड होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
गाजीपूर बॉर्डर दिल्ली येथील किसान आंदोलनात राजू शेट्टी यांनी भेट देऊन अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय आणि त्यांना मान्य नसलेले जे कायदे आहेत, ते मागे घ्यावेत. हमीभाव कायदेशीर करावा, हाच यावरचा पर्याय आहे. शेतकरी ज्या हमीभावाच्या कायद्याची मागणी करीत आहे तो कायदा न आणता ज्या कायद्यांमध्ये शेतकऱ्यांची लूट होईल तो कायदा केंद्र सरकार वारंवार शेतकऱ्यांच्या भल्याचे कायदे असल्याचे सांगत आहे. जर हे कायदे शेतकऱ्यांच्या भल्याचे असते तर देशात सुरू असलेल्या या आंदोलनात एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले नसते, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. यावेळी मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे यांच्यासह अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
चौकट - केंद्राने मोठेपणा दाखवावा : राजू शेट्टी
पंजाब, उत्तर प्रदेश व उत्तराखंड राज्यांचे हे आंदोलन नसून संपूर्ण देश काश्मीरपासून ते कन्याकुमारीतील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाला आहे. आता हे आंदोलन संपूर्ण देशभर जोर धरू लागले आहे. केंद्र सरकारने मनाचा मोठेपणा दाखवावा, असेही राजू शेट्टी म्हणाले.
फोटो - १२१२२०२०-जेएवाय-०४
फोटो ओळ - दिल्ली येथील गाजीपूर बॉर्डरजवळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सहभाग घेतला.