उमेदवारीसाठी आग्रह नको, थांबावे लागले तर तयारी ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:22 IST2021-04-14T04:22:09+5:302021-04-14T04:22:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’ निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू आघाडी जम्बो झाली असून उमेदवारीबाबत सगळ्यांचे समाधान करू शकत ...

उमेदवारीसाठी आग्रह नको, थांबावे लागले तर तयारी ठेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकूळ’ निवडणुकीसाठी विरोधी राजर्षी शाहू आघाडी जम्बो झाली असून उमेदवारीबाबत सगळ्यांचे समाधान करू शकत नाही. त्यामुळे उमेदवारीसाठी आग्रह करू नको, थांबावे लागले तर तशी तयारी ठेवावी, अशा सूचना नेत्यांनी दिल्या.
‘गोकूळ’साठी विरोधी पॅनल बांधणी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यादृष्टीने मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आ. राजेश पाटील व माजी आ. संध्यादेवी कुपेकर यांनी इच्छुकांशी संवाद साधला. ‘गोकूळ’साठी २ मे रोजी मतदान होत आहे, दिवस कमी राहिल्याने पॅनलची घोषणा लवकर करून उमेदवारांना प्रचारासाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पॅनलला अंतिम स्वरूप द्यावे लागणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. शाहू आघाडी जम्बो झाली आहे, साहजिकच इच्छुकांची संख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत सगळ्यांचे समाधान होऊ शकत नाही. त्यामुळे उमेदवारीसाठी आग्रह करू नको, थांबावे लागले तर तयारी ठेवा, अशी सूचना दोन्ही मंत्र्यांनी केल्या.
मुलाखतीसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, संग्रामसिंह कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, मुकुंद देसाई, विष्णुपंत केसरकर, जयवंतराव शिंपी, अल्बर्ट डिसोझा, एम. के. देसाई, गोपाळराव पाटील, सचिन घोरपडे, सदाशिव चरापले, विजयसिंह मोरे, किरणसिंह पाटील, बयाजी शेळके, नितीन जांभळे, विद्याधर गुरबे आदी उपस्थित होते.
उमेदवारी निश्चित असणारे प्रचारात
ज्यांची उमेदवारी निश्चित आहे, त्यांना मुलाखतीसाठी बोलावले नव्हते. यामध्ये ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, शशिकांत पाटील-चुयेकर, नवीद मुश्रीफ, रणजीतसिंह कृ. पाटील, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचे उमेदवार आदी गैरहजर राहिले होते.
ठरावांच्या संख्येवरून दावे
मुलाखतीत आपण किती पक्षांशी एकनिष्ठ आहेत, हे पटवून देत असतानाच आपण किती ठराव गोळा केले, हेही सांगण्यात आले.