खचू नका, ऊठा... पुन्हा जिंकायचे आहे..!

By Admin | Updated: May 21, 2014 17:35 IST2014-05-21T01:12:32+5:302014-05-21T17:35:38+5:30

काँग्रेसच्या आढावा बैठकीत आवाहन : भाजपकडून महागाईबाबत खोटा प्रचार : पी. एन. पाटील

Do not worry, you have to win again ...! | खचू नका, ऊठा... पुन्हा जिंकायचे आहे..!

खचू नका, ऊठा... पुन्हा जिंकायचे आहे..!

कोल्हापूर : ज्या ज्यावेळी कॉँग्रेस पक्षाचा पराभव झाला त्या त्यावेळी पुन्हा दीड-दोन वर्षांनंतर कॉँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. त्यामुळे यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाने कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. पुन्हा एकदा जोमाने कामाला लागावे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहा, जिंकायचे आहे, असे आवाहन मंगळवारी दुपारी कॉँग्रेस कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या आढावा मेळाव्यात करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील होते. देशात आणि महाराष्टÑात कॉँग्रेस पक्षाचा झालेला दारुण पराभवाची छाया आजच्या मेळाव्यावर होती. उपस्थित असलेल्या सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावर नाराजी दिसत होती. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांना धीर आणि आधार देण्याचे काम यावेळी करावे लागले. कोल्हापूरच्या इतिहासात कधी नाही ते दोन्ही कॉँग्रेसचे कार्यकर्ते एकदिलाने निवडणुकीला सामोरे गेले. परंतु कॉँग्रेस पक्षाने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्यात आपण कमी पडलो, अशी प्रांजळ कबुली नेत्यांनी आपल्या भाषणात दिली. देशातील परिवर्तनाची लाट लक्षात घेता कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागण्याशिवाय पर्याय नाही, असा सल्ला कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी दिला. निवडणुकीत सर्व कार्यकर्ते जिद्दीने काम करीत होते, तरीही आपला पराभव झाला. याबाबत कोणावर गैरविश्वास नाही की कोणाविषयी तक्रार नाही. विरोधकांनी निवडणूक काळात कॉँग्रेससंदर्भात गैरसमज पसरविले. लोकसभा निवडणुकीमुळे आता अंदाज आलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना प्रत्येकाने आपली प्रतिष्ठा, मतभेद बाजूला ठेऊन जागृतपणे लढायला पाहिजे, असे आवाहनही आवाडे यांनी केले. गेल्या पाच वर्षांत आघाडी सरकार चालविताना सहकारी पक्षाच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे व महागाईबाबत आरोप झाले. सर्व आरोप चुकीचे होते. तरीही त्याचा परिणाम कॉँग्रेसवर झाला, असे सांगत जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले. माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचेही भाषण झाले. यावेळी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी आमदार बजरंग देसाई, अनिल यादव, अंजना रेडेकर यांची भाषणे झाली. यावेळी प्रकाश आवाडे, दिनकरराव जाधव, संजिवनी गायकवाड, सदाशिव चरापले, बाळासाहेब सरनाईक, अमल महाडिक, संध्या घोटणे, बाबासाहेब भुयेकर, दीपा पाटील, वैशाली महाडिक, आदी उपस्थित होते.

Web Title: Do not worry, you have to win again ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.