‘पगारवाढ नको, स्थिरता द्या’

By Admin | Updated: August 10, 2015 01:14 IST2015-08-10T01:14:08+5:302015-08-10T01:14:08+5:30

रोजंदारी कर्मचाऱ्यांची आर्त हाक : आॅर्डरची वाट पाहतच शेख यांची सेवानिवृत्ती

'Do not raise salary, give stability' | ‘पगारवाढ नको, स्थिरता द्या’

‘पगारवाढ नको, स्थिरता द्या’

कोल्हापूर : एकवेळ पगारवाढ देऊ नका, पण नोकरीत स्थिरता द्या, अशी आर्त हाक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाला दिली आहे. गेली सात वर्षे डोक्यावर अस्थिरतेचे ओझे घेऊन तुटपुंज्या पगारावर काम सुरू आहे. ‘आज आॅर्डर मिळेल, उद्या मिळेल’ या आशेवरच चाँदसाहेब शेख हे रोजंदारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले. अशाच पद्धतीने त्यातील अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीकडे झुकले आहेत. जिल्हा बँकेत गेली सात वर्षे दिवसाला ऐंशी रुपये पगारावर शंभर कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा बँकेतील नोकरीला समाजात ‘क्रेझ’ असल्याने अनेकांनी नोकरी स्वीकारली, पण कर्मचाऱ्यांनी बॅँकेत पाय ठेवून कसेतरी वर्ष होते तोपर्यंत बँकेवर प्रशासक मंडळ आले.
पगार दिवसाला ऐंशी रुपये, एवढ्या त्रोटक रकमेत घरातील चार-पाचजणांची जबाबदारी सांभाळायची कशी? असा यक्षप्रश्न या कर्मचाऱ्यांपुढे आहे. बँकेची आर्थिक स्थिती पाहता प्रशासक मंडळालाही या कर्मचाऱ्यांबाबत काही करता येईना. मागे जाता येईना आणि पुढे आशेचा किरण दिसेना, अशा अवस्थेत कर्मचाऱ्यांनी गेली सात वर्षे काढली. कमी पगार असला तरी कामाशी प्रामाणिक राहून बँकेच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली. आता संचालक मंडळ कार्यरत झाले आहे. या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात वाढ करावी, अशी मागणी होत आहे. पगारवाढ झालीच पाहिजे, पण त्याबरोबर त्यांना नोकरीत स्थिरता दिली पाहिजे.
सध्या बँकेचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त झाल्याने अनेक शाखांत कायम कर्मचारी कमी आहेत. तेथील शाखांचा डोलारा हा रोजंदारी कर्मचारीच चालवत आहेत, पण त्यांना युजर कोड नसल्याने काम करताना मर्यादा येत आहेत. प्रोबेशनल नियुक्ती करून त्यांना युजर कोड दिला तर शाखांचे कामकाज सुरळीत होईलच, पण त्याबरोबर रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात स्थिरता येईल. ( प्रतिनिधी)

शेख यांचे मदतीचे आवाहन
या रोजंदारी कर्मचाऱ्यांपैकी चाँदसाहेब नसरूद्दीन शेख हे शिपाईपदावरून सेवानिवृत्त झाले. कोणताही कर्मचारी सेवानिवृत्त होताना चार पैसे घेऊनच घरी जातो, पण शेख रिकाम्या हातानेच घरी परतले. पुढील आयुष्य जगायचे कसे? असा त्यांच्यासमोर प्रश्न असून, त्यांनी प्रत्येक शाखेत पत्र पाठवून मदतीचे आवाहन केले आहे.

Web Title: 'Do not raise salary, give stability'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.