‘गोकुळ’ची साथ सोडू नका

By Admin | Updated: September 8, 2016 00:50 IST2016-09-08T00:48:29+5:302016-09-08T00:50:43+5:30

अरुण नरके यांची विनवणी : हात जोडून केले कळकळीचे आवाहन; भाषणाने बदलले सभेचे वातावरण

Do not leave Gokul with you | ‘गोकुळ’ची साथ सोडू नका

‘गोकुळ’ची साथ सोडू नका

कोल्हापूर : कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्यानंतर ‘गोकुळ’च्या प्रगतीमध्ये ज्यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला जातो, त्या अरुण नरके यांच्या भाषणाने तापलेले सभामंडपातील वातावरण एकदम बदलून गेले. एकीकडे शासनाच्या चुका, दुसरीकडे ‘गोकुळ’चे महत्त्व, महाडिक आणि पी. एन. पाटील यांचे मान्य केलेले नेतृत्व आणि ‘अमूल’ला टक्कर देण्यासाठी ‘गोकुळ’ची साथ सोडू नका, असे हात जोडून केलेले आवाहन यांमुळे नरके यांची विषयाची मांडणी सभासदांना भावली.
महाडिक, पी. एन. यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा आधारस्तंभ म्हणून मी तुमच्यासमोर उभा असल्याचे नरके यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. नियमाप्रमाणे २ सप्टेंबरपर्यंत लेखी प्रश्न देणे आवश्यक असताना तुमचे एवढे प्रश्न साठले होते, तर तुम्ही ते लेखी का दिले नाहीत? असा पहिलाच प्रश्न त्यांनी विरोधकांना केला.
‘लोकमत’च्या २९ जूनच्या अंकाचा संदर्भ देताना नरके म्हणाले की, या अंकात मी आमच्यावर ‘अमूल’रूपी संकट येणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होेते. येथे जी काही प्रश्नोत्तरे होणार आहेत, ती संघ मोडण्यासाठी नव्हे, तर तो पुढे नेण्यासाठी व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘अमूल’ पाच वर्षांपूर्वी मुंबईत आला. आज त्यांनी इतकी प्रगती करून ठेवली आहे की त्यांचा ब्रॅँड विकायचा म्हटले तरी ४0 हजार कोटी रुपये त्याची किंमत होते.
महाराष्ट्रासाठी ‘अमूल’ने सहा हजार कोटी रुपये बाजूला काढून ठेवले आहेत. महाराष्ट्रातील ७६ दूध संघांपैकी केवळ दहा किंवा बारा संघ चालले असताना त्यामध्ये ‘गोकुळ’ अव्वल आहे. मात्र ‘अमूल’ने १५ ठिकाणी जमिनी घेतल्या आहेत.
‘अमूल’ला महाराष्ट्रात परवानगी देऊ नका, अशी मागणी आम्ही तत्कालीन दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे केली होती. मात्र तोपर्यंत त्यांचे पद गेले. आम्ही न्यायालयात गेलो; परंतु याबाबतची स्थगिती उठविल्याने ‘अमूल’ला रान मोकळे झाले आहे. सुरुवातीला अमूलने ‘महानंद’ची मदत घेतली; परंतु आता ‘महानंद’वरच प्रशासक येण्याची वेळ आल्याचे नरके म्हणाले.
यावेळी आमदार सतेज पाटील बोलायला उठत असताना नरके यांनी, ‘आमदार साहेब, थांबा. या सगळ्यांमध्ये ‘गोकुळ’ची जर ‘महानंद’सारखी अवस्था झाली तर काय मिळवणार आहात?’ असा प्रश्न उपस्थित केला. २० वर्षांपूर्र्वी सरकारने निर्णय घेतला आणि गावागावांत दहा-दहा दूध संस्था निघाल्या. पाच मिनिटांत गावातून दूध घेऊन येणारी आमची गाडी आता गावातच पंधरा ठिकाणी फिरते. ‘अमूल’ने मात्र प्रत्येक गावात एकच दूध संस्था, एक जिल्हा संघ असे सूत्र ठेवत रोज दोन कोटी लिटर दूध संकलन करीत असल्याने त्यांना काही गोष्टी परवडतात, असे गणित नरके यांनी सांगितले. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे सहा महिन्यांत आरे ब्रॅँड लोकप्रिय करणार असल्याचे सांगत आहेत. मात्र तसे झाल्यावर जर ‘गोकुळ’चे दूध कमी झाले तर ‘गोकुळ’वर अवलंबून असणाऱ्या सात लाख कुटुंबांची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न नरके यांनी उपस्थित केला. याबाबत आपण त्यांना पत्र लिहिले असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

आमच्यात मारामारी नाही
‘गोकुळ’च्या अध्यक्षपदावरून विश्वास पाटील आणि अरुण नरके यांच्यात मतभेद असल्याचे वातावरण निर्माण झाले असताना आम्ही चुयेकरांच्या हाताखाली शिकलो असल्याचे नरके यांनी सांगितले. ते फारसे शिकले नव्हते; परंतु ते शेवटपर्यंत जिल्ह्यातील कुठल्याही नेत्याच्या हाताला लागले नाहीत. तसा मीही कुणाच्या तावडीत सापडलो नाही, असे नरके यांनी सांगितले. आमच्यात काही मारामारी नाही. पाच वर्षांची शपथ घेतली आहे, असे नरके यांनी स्पष्ट केले.
सतेज पाटील यांनी काढले चिमटे
‘अमूल’ आल्यानंतर ‘गोकुळ’च्या भल्यासाठी आम्हीही रस्त्यावर उतरायला तयार आहोत; पण बाबा देसाई उतरणार नाहीत. मात्र, त्यांचा तुम्हाला उपयोग होईल, अशी टिप्पणी सतेज पाटील यांनी केली. नरके यांनी डी. व्ही. घाणेकर हे आमचे गुरू आहेत, असा उल्लेख केल्याचा संदर्भ घेत एम. डी. घाणेकर आहेत की शहा आहेत, हे आम्हांला माहीत नाही, असे सांगत असतानाच सतेज यांनी नरके यांचा ‘काका’ म्हणून उल्लेख केला.
‘अमूल’बरोबर सहकार्याचा प्रस्ताव
‘अमूल’ला प्रामुख्याने गाईचे दूध हवे असते. आमच्याकडे असलेले तीन लाख लिटर दूध त्यांना द्यायचे आणि त्यांनी म्हशीचे दूध संकलन करायचे नाही, असा समझोत्याचा प्रस्ताव मांडला जाईल, असे ते म्हणाले.


भावविवश : ... अन् नरकेंचे डोळे डबडबले
नरके यांनी चौफेर मुद्दे मांडत आपले भाषण सुरू ठेवले. त्यांनी ‘अमूल’ जर कोल्हापूरला आले आणि केवळ विरोधासाठी विरोध म्हणून जर काहीजणांनी म्हशीचे दूध तिकडे घालायला सुरुवात केली तर ‘गोकुळ’चे काय होईल? असा प्रश्न विचारत ‘पाया पडतो; परंतु असे काही करून संघ मोडू नका,’ असे आवाहन केले. ‘गोकुळ संघ दर दहा दिवसांनी ४० कोटी रुपये देतो हे लक्षात घ्या,’ असे सांगताना त्यांचा गळा दाटून आला आणि डोळे पाण्याने डबडबले. यानंतर पाणी मागवून घेऊन त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली.

क्षणचित्रे
चॉपकटरचा जाब जिल्हा परिषदेत विचारा
चौदा हजारांचा चॉपकटर अठरा हजार सहाशे रुपयांना कसा माथी मारता? असा प्रश्न देवकर यांनी केल्यानंतर, ‘तोच चॉपकटर जिल्हा परिषदेत २७ हजारांना घेतला, तिथे का विचारत नाही?’असा टोला अध्यक्षांनी हाणला.
‘स्कार्पिओ’ परत करा, जाहीर सत्कार करतो!
संचालकांकडे असणाऱ्या स्कार्पिओ गाड्यांवर वर्षाला चार कोटी खर्च होत असल्याचे निदर्शनास आणून देत, यापुढे गाड्या बंद करण्याची सभेत घोषणा करा. व्यासपीठावर येऊन संचालकांचा सत्कार करतो, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.
आपण ‘ससा’च, आणि ते पारधी
सभेतील गोंधळ पाहून श्रीपती पाटील (हसूर) म्हणाले, ‘कोणी मंजूर आणि नामंजूर म्हणू नका. जरी आपण ‘नामंजूर’ म्हणालो तरी प्रोसिडिंगला ते ‘मंजूर’च होणार आहे. आपण ‘ससा’ आणि ते पारधी आहेत,’
विजयराव, तेव्हा उंबरा झिजवलात की हो...
बच्चू कडू यांनी वाढीव वेतन नाकारले. पारदर्शक कारभाराच्या एवढ्याच गप्पा मारता तर तुम्ही वेतन का घेता? असा टोला विजय डोंगळे यांनी हाणला. त्यावर संतप्त होऊन, ‘विजयराव, उमेदवारीसाठी आपण माझा उंबरा झिजविला होता, हे विसरला का?’ असे आमदार पाटील यांनी सुनावल्यानंतर धीरज डोंगळे हे आक्रमक झाल्याने गोंधळ उडाला.
तीन ठिकाणी तपासणी
सभास्थळाच्या दोन्ही बाजूंनी प्रवेश दिला जात होता. सत्तारूढ गटाचे समर्थक पितळी गणपतीच्या बाजूने म्हणजेच दक्षिणेकडून, तर विरोधक उत्तरेकडून आत आले. सभास्थळी येईपर्यंत पोलिसांनी संस्था प्रतिनिधींची तीनवेळा तपासणी केली. संस्था ठरावाबरोबर ओळखपत्र असल्याशिवाय सोडले जात नव्हते.
सत्कारमूर्तींचा मंडपातून काढता पाय
या सभेमध्ये गोकुळश्री, गुणवंत कर्मचारी या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विजेते फेटे बांधून सहकुटुंब, सहपरिवार आले होते. त्यांचे सत्कार झाले. त्यानंतर प्रत्यक्ष जेव्हा सभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा वातावरण तापायला सुरुवात झाली. हा सर्व गोंधळ पाहून सत्कारमूर्तींनी सभामंडपातून काढता पाय घेतला.
आता सुपरवायझर त्रास देणार
सभा झाली. आता आमच्याबरोबर जे-जे आले आहेत त्यांच्या संस्थांना उद्यापासून सुपरवायझर त्रास द्यायला सुरुवात करणार; परंतु कुणालाही काहीही अडचण आली तरी दर महिन्याला ‘गोकुळ’ला जाब विचारण्यासाठी येण्याची आपली तयारी असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.

Web Title: Do not leave Gokul with you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.