दंगलीतून चुली पेटत नाहीत
By Admin | Updated: October 8, 2014 21:47 IST2014-10-08T21:15:59+5:302014-10-08T21:47:13+5:30
प्रकाश आवाडे यांचे आवाहन : इचलकरंजीतील कामगार चाळीत पदयात्रा

दंगलीतून चुली पेटत नाहीत
इचलकरंजी : कॉँग्रेस पक्षाने मंजूर केलेल्या योजना आम्ही इचलकरंजीत आणल्या असून, त्या मी केल्या म्हणून वल्गना करणाऱ्या आणि जनतेचा प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्यांना लोकप्रतिनिधीचे काम करता आले नाही. मात्र, त्यांनी सवलतीच्या दरात मिळणाऱ्या विजेची चोरी केली. कष्टाला कोणतीही जात नसते अन् दंगलीतून कधीही चुली पेटत नसतात. या निवडणुकीत त्यांना चोख उत्तर मिळेल, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.
येथील कामगार चाळ येथून प्रचार पदयात्रेला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर पाटील वाडा, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, महात्मा गांधी हौसिंग सोसायटी, इंडस्ट्रियल इस्टेट, समाजवादी प्रबोधिनी, शाहूनगर, बालाजी प्रोसेसर्स परिसर, जोशी दवाखाना परिसरात ही पदयात्रा निघाली. त्यानंतर इंडस्ट्रियल इस्टेटमधील चौकात झालेल्या कॉर्नर सभेत आवाडे बोलत होते.
शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचे ध्येय उराशी बाळगले असून, त्यादृष्टीने पावलेही टाकली आहेत. त्यानुसार जयभीमनगर व नेहरूनगर याठिकाणी घरकुलांचे काम सुरू असून, लवकरच सर्वच झोपडपट्ट्यांचे आहे त्याचठिकाणी पुनर्वसन करून प्रत्येकाला त्याच्या हक्काचे घरकुल मिळणार आहे. या कामासंदर्भात गत पाच वर्षात विद्यमान आमदारांनी काहीचा पाठपुरावा केला नाही. उलट या चांगल्या कामात आडवा पाय मारण्याचे काम केले आहे. ज्या शहराने वस्त्रोद्योगात जागतिक पटलावर नाव कोरले, त्याच शहराची मान व प्रतिष्ठा आमदारांनी वीज चोरी करून खाली घालवली.
रवी रजपुते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अरुण कांबळे यांनी केले. सुदीप वडिंगे यांनी आभार मानले. याप्रसंगी नगरसेवक तानाजी पोवार, विनोद आवळे, संतोष कांदेकर, गणेश जाधव, आदींची भाषणे झाली.
नगरसेविका रेखा रजपुते, प्रमिला जावळे, रंगराव लाखे, प्रकाश आवळे, शशिकांत कांबळे, नारायण यरगुंटला, झाकीर जमादार, शेखर वराळे, अरुण निंबाळकर, प्रदीप कांबळे, बयाबाई गेजगे, नरेश नगरकर, राजू भडंगे, शांताराम लाखे, बाबासाहेब देसाई, चंद्रकांत कांबळे, अमित काकडे, प्रवीण कांबळे, विलास कुरणे, अशोक कांबळे, संतोष मुळे, उमेश कांबळे, प्रशांत आवळे, बबन कांबळे, नितीन चव्हाण उपस्थित होते. (प्रतिनिधी)