किशोरवयीन मुलींना निकृष्ट आहाराचे वितरण
By Admin | Updated: September 6, 2015 23:27 IST2015-09-06T23:27:34+5:302015-09-06T23:27:34+5:30
चंदगड पंचायत समिती सभा : संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करावा

किशोरवयीन मुलींना निकृष्ट आहाराचे वितरण
चंदगड : शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे किशोरवयीन मुलींना पुरवला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप सदस्य निंगू गुरव यांनी करून पंचायत समिती बैठकीत या निकृष्ट धान्याचे नमुनेच सादर केले. यामुळे निकृष्ट आहार पुरविणाऱ्या ठेकेदाराचा ठेकाच रद्द करावा, अशी मागणी शुक्रवारी झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली. अध्यक्षस्थानी सभापती ज्योती पवार-पाटील होत्या.गटविकास अधिकारी एस. डी. सोनावणे यांनी प्रास्ताविक केले. कक्ष अधिकारी बाजीराव पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. प्रभारी प्रकल्प अधिकारी एस. आर. नरवाडकर यांनी महिला बालकल्याण विभागाचा अहवाल सादर केला. यावेळी सदस्य निंगू गुरव यांनी या विभागातर्फे पुरविण्यात येणारा शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे. शेंगदाणे कुबाटलेले, तर गहू कुजलेले आहेत आणि अशाच धान्याचा पुरवठा तालुक्यात केला जात आहे. हा पुरवठा तत्काळ बंद करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. नरवाडकर यांनी ठेकेदाराने जबरदस्तीने निकृष्ट आहार देण्याचा प्रयत्न केल्यास तो अंगणवाडी सेविकांनी स्वीकारू नये, तसेच याबाबत कार्यालयाशी अथवा पर्यवेक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधावा, असे आवाहन केले.
पाणीपुरवठा विभागाचे अभियंता एस. ए. सावळगी यांनी दूषित पाणी नमुने सापडलेल्या गावांना आरोग्य विभागाने तत्काळ कर्मचारी पाठवून पाणी शुद्धिकरण मोहीम राबवावी, अशी मागणी केली. कधीही दुष्काळ न पडणाऱ्या चंदगड तालुक्यात पाऊस पडावा म्हणून प्रार्थनाही केली. उपसभापती शांताराम पाटील यांनी पाणी योजनांची अर्धवट कामे करणाऱ्या ठेकेदारांना कळवूनही अद्याप कामे पूर्ण झालेली नाहीत, ती करून घ्यावीत, अशी सूचना केली.
ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. एस. एस. माने यांनी बदलत्या वातावरणामुळे तालुक्यात सर्दी व तापाचे प्रमाण वाढले आहे. यातून स्वाइन फ्लूसारखा आजारही होईल. अशा आजाराची लक्षणे आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी आळंदे यांनी अहवाल सादर करून राजर्षी शाहू ग्रामस्वच्छता अभियानाची कार्यशाळा गुरुवारी (दि. १०) असून, सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. होसूरसह अन्य गावांना पाणीपुरवठा वीज बिलात सवलत मिळावी, अशी मागणी उपसभापती पाटील यांनी केली. यावर अभियंता अष्टेकर यांनी ज्या ग्रामपंचायती एकरकमी बिल भरतील, त्यांना सवलत देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी हसिना नाईकवाडी, अनुराधा पाटील, तुळसा तरवाळ, नंदिनी पाटील यांनी चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)