आपटेनगर टाकीतून पाणीपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST2021-06-01T04:17:36+5:302021-06-01T04:17:36+5:30
कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी ‘ई’ वॉर्ड परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा ‘ए’ वॉर्डातील पाच ते ...

आपटेनगर टाकीतून पाणीपुरवठा खंडित
कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी ‘ई’ वॉर्ड परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा ‘ए’ वॉर्डातील पाच ते सहा प्रभागांतील पाणीपुरवठा खंडित झाला. फुलेवाडी रिंगरोड येथे २७ इंची जलवाहिनीला अचानक गळती लागल्यामुळे सोमवारी दिवसभर आपटेनगर टाकीतून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला.
शहराच्या विविध भागांत पाणीपुरवठा करण्याकरिता बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातून चंबुखडी पाण्याची टाकी येथे पाणी आणले आहे. तेथून एक जलवाहिनी रंकाळा टॉवर मार्ग टाकण्यात आली आहे, तर दुसरी फुलेवाडी रिंगरोडमार्गे आपटेनगर येथे आणली असून, आपटेनगर येथील टाकीत पाणी सोडले जाते. सोमवारी पहाटे साडेपाच वाजता आपटेनगर टाकीकडे जाणारी जलवाहिनीला फुलेवाडी जकात नाक्याच्या समोर गळती सुरू झाली.
शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्याच्या नेमक्या वेळीच ही गळती सुरू झाल्यामुळे त्या मार्गावरील पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. त्यामुळे सकाळी आपटेनगर टाकीला पाणीपुरवठा झाला नाही. परिणामी आपटेनगर टाकीवर अवलंबून असलेल्या सहा-सात प्रभागांना, तसेच शिवाजी पेठेच्या काही भागाला पाणी मिळाले नाही. नागरिकांची त्यामुळे मोठी गैरसोय झाली.
दरम्यान, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जलवाहिनीची गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. ज्या ठिकाणी गळती लागली तेथील आठ फुटांची जलवाहिनी कट करून नवीन जोडवी लागली. सायंकाळी उशिरापर्यंत काम सुरूच होते. त्यामुळे आपटेनगर टाकीवर अवलंबून असलेल्या प्रभागांना रात्रीपर्यंत पाणी मिळाले नाही. परंतु आज, मंगळवारपासून नियमित पाणीपुरवठा होईल, असे सांगण्यात आले. गेल्या वर्षभरापासून पाणीपुरवठ्याच्या कसल्याच तक्रारी नव्हत्या, पण गेल्या आठ दिवसांत दोन वेळा शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला.