‘सिद्धगिरी’वर निरोगी आरोग्याची पहाट
By Admin | Updated: January 23, 2015 00:36 IST2015-01-23T00:16:38+5:302015-01-23T00:36:57+5:30
रामदेवबाबांच्या योग शिबिराला गर्दी : आबालवृद्ध भारावले; आज समारोप

‘सिद्धगिरी’वर निरोगी आरोग्याची पहाट
कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून विविध विषयांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत असलेल्या सिद्धगिरी मठाच्या परिसरात आज, गुरुवारी वेगळे चैतन्य संचारले होते. योगगुरू रामदेवबाबा यांच्या तेजस्वी वाणी आणि कृतीतून प्रतीत होणारे सदृढ, सशक्त आणि निरोगी आयुष्याचे रहस्य जाणून घेताना याठिकाणी जमलेल्या आबालवृद्ध कृतार्थतेने भारावले होते.
रामदेवबाबा यांच्याकडून योग व प्राणायामचे धडे घेताना जणू त्यांच्या समृद्ध आरोग्याची पहाट उगवली. कोवळी किरणे आणि बोचऱ्या थंडीच्या साक्षीने सुमारे अडीच तासांच्या शिबिरात रामदेवबाबा यांनी उपस्थित आबालवृद्धांना कपालभाती, अनुलोम-विलोम, योगिक-जॉगिंग, सूर्य नमस्काराचे धडे दिले शिवाय विनोदाच्या कोट्या करत निरोगी, सदृढ आणि समृद्ध भारताची संकल्पना मांडली. मठाच्या परिसरात साकारलेल्या ‘राजर्षी शाहू महाराज नगरी’तील मुख्य मंडपात शिबिरासाठी पहाटे साडेतीन वाजल्यापासून गर्दी होऊ लागली. उद्या, शुक्रवारी समारोप होणार आहे.(प्रतिनिधी)
रामदेवबाबा म्हणाले...
जितके लोक औषधे न खाता आजारी पडतात. त्यापेक्षा औषध खाऊन आजारी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासह रक्तदाब, शुगर, आदींवर प्राणायाम हा चांगला पर्याय आहे.
आयुष्यात संन्यासी झाल्यानंतरच मुक्ती मिळते. त्यात संन्यासी होणे म्हणजे लोभ, माया, काम आणि क्रोध सोडणे, पण त्यासाठी अंतर्गत ‘कनेक्टिव्हिटी’ असावी लागते आणि ती योगा, प्राणायामातून मिळते.
विश्वास भंग होत असल्याने कुटुंबासह समाज दुभंगला जात आहे. ते धोकादायक ठरणारे आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्यावर इतरांचा विश्वास कायम राहील या पद्धतीने वर्तन ठेवावे.