अमन मित्तल यांच्या बदलीची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST2021-01-08T05:20:34+5:302021-01-08T05:20:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या ...

अमन मित्तल यांच्या बदलीची चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या बदलीच्या चर्चेने जोर धरला आहे. मात्र ते कोल्हापूरचे जिल्हाधिकारी होणार की अन्यत्र जाणार, याचीही मोठी उत्सुकता आहे.
मित्तल यांनी १६ ऑगस्ट २०१८ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला होता. कमी वयातील अधिकारी आणि त्यांनी आधी जिल्हा परिषदेकडे काम न केल्याने सुरुवातीला त्यांना येथील वातावरण नवखे होते; परंतु नंतर ते सरावले. कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी त्यांच्याकडे महत्त्वाच्या अनेक जबाबदाऱ्या दिल्या. त्यांना आता दोन वर्षे पाच महिने पूर्ण झाले आहेत. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा विचार करून त्यांची बदली थांबली होती. दरम्यान, मित्तल हे दौलत देसाई यांच्या बदलीनंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त होणार असल्याची चर्चा गेले दोन महिने जिल्हा परिषदेत सुरू आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची भूमिका जिल्हाधिकारी नियुक्तीमध्ये महत्त्वाची राहणार आहे. त्यांनीही मित्तल यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याचे समजते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी पदासाठी अन्य नाव पुढे आणल्याने सध्या हा विषय प्रलंबित ठेवण्यात आल्याचे समजते. आता कोरोनाचा संसंर्ग कमी झाला आहे. मित्तल हे बदलीसाठीही पात्र आहेत. त्यामुळे येत्या महिन्या, दोन महिन्यांत त्यांची बदली निश्चित मानली जाते. फक्त ते कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून येणार की अन्यत्र जाणार, याची उत्सुकता आहे.
चौकट
संजयसिंह चव्हाण यांची ‘सीईओ’पदासाठी चर्चा
दरम्यान, सध्या जलस्वराज्यमध्ये कार्यरत असलेले संजयसिंह चव्हाण यांच्या नावाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदासाठी जोरदार चर्चा आहे. चव्हाण हे गडहिंग्लजचे प्रांताधिकारी म्हणून याआधी कार्यरत होते. त्यानंतर ते सांगली येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी व पुणे विभागीय कार्यालयात उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांना गेल्याच महिन्यात आयएएस केडर मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा जोरात आहे.