पी.एन.- नरके यांच्यात रंगले ‘डिजिटल’ युद्ध
By Admin | Updated: July 21, 2014 00:48 IST2014-07-21T00:47:33+5:302014-07-21T00:48:04+5:30
ऐन पावसाळ्यात करवीरची हवा गरम : निवडणुकीत टोकाचा संघर्ष पाहावयास मिळणार

पी.एन.- नरके यांच्यात रंगले ‘डिजिटल’ युद्ध
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीला अजून तीन महिने अवधी असला तरी करवीर विधानसभा मतदारसंघात डिजिटल पोस्टरच्या माध्यमातून आतापासूनच नेते एकमेकांच्या आमने-सामने ठाकले आहेत. ‘जाणीव झाली बदल करा, हीच वेळ आहे परिवर्तनाची’ असे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे समर्थक आवाहन करीत आहेत, तर ‘जनता जाणून आहे, झालेला विकास आणि आपुलकीचा संपर्क’ असा टोला शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या समर्थकांनी हाणला आहे. सध्या अशी पोस्टर करवीर मतदारसंघात ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहेत. राज्यात आघाडी व महायुतीमधील समीकरणे कशीही बदलली तरी करवीर विधानसभा मतदारसंघात पी. एन. पाटील व चंद्रदीप नरके यांच्यात खरी लढत होणार आहे. पी. एन. पाटील १९९५ पासून विधानसभेच्या रिंगणात आहेत. मात्र, त्यांना एकदाच आमदारकी मिळविण्यात यश आले आहे. गेल्या वेळी नवीन मतदारसंघ असल्याने त्यांचे आडाखे चुकले आणि फटका बसला; पण गेल्या पाच वर्षांत त्यांनी गगनबावडा, पन्हाळा तालुक्यांत बऱ्यापैकी गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी प्रचाराची व्यूहरचना बदलली आहे. आमदार चंद्रदीप नरके गेल्या वेळेला गगनबावडा व भोगावती खोऱ्यात बॅकफूटवर पडले होते; पण गगनबावडा तालुक्यात त्यांनी बऱ्यापैकी पॅचवर्क केले आहे. पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनीही संपर्क मोहीम तीव्र केली आहे. इतर मतदारसंघांत उमेदवारीवरून अजून चर्चाच सुरू असताना करवीरमध्ये मात्र तीन महिने अगोदरच हवा गरम होण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या आधीच हे दोन नेते डिजिटलच्या माध्यमातून आमने-सामने आल्याने ऐन पावसाळ्यात ‘करवीर’ची हवा चांगलीच गरम झाली आहे. ४गेल्यावेळी नवीन व ताकदीचा उमेदवार मिळाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नरके यांच्या विजयासाठी जिवाचे रान केले; पण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपासून अंतर्गत बंडाळी उफाळून आली. ४यातूनच उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील यांनी उमेदवारीची मागणी केल्याने नरके यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिवसैनिकांना विश्वासात घेऊन त्यांना मोट बांधूनच पुढे जावे लागणार आहे.