‘डाएट’कडून शिक्षकांना निव्वळ प्रशिक्षण, प्रत्यक्षात मूल्यमापन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST2021-06-01T04:17:30+5:302021-06-01T04:17:30+5:30
‘डाएट’कडून अध्यनस्तर निश्चितीचे काम केले जाते. शाळाभेटी, पर्यवेक्षण आणि चार टप्प्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन केले जाते. ...

‘डाएट’कडून शिक्षकांना निव्वळ प्रशिक्षण, प्रत्यक्षात मूल्यमापन नाही
‘डाएट’कडून अध्यनस्तर निश्चितीचे काम केले जाते. शाळाभेटी, पर्यवेक्षण आणि चार टप्प्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन केले जाते. शाळाभेटीनंतर शिक्षकांची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या अध्यापनाबाबत काही सूचना केल्या जातात. नवीन शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. निवडश्रेणी, वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांचे प्रत्यक्षात मूल्यमापन होत नाही. प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचे प्रत्यक्षात मूल्यमापन करण्याची यंत्रणाच नाही.
‘डाएट’ काय करते?
१) वर्गाध्यापन निरीक्षण, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण अनुधावन
२) शैक्षणिक साहित्यांच्या वापराचे मूल्यमापन. विद्यार्थ्यांकडून होणार वापर, परिणामकारक वापर तपासणी.
३) शिक्षक अध्यापन, विद्यार्थी संपादणूक यावर आधारित शैक्षणिक संशोधन करून उपाययोजना सुचविणे.
४) शैक्षणिक परिषदांद्वारे मार्गदर्शन, वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण व मूल्यमापन.
५) अध्ययन निष्पत्तीवर आधारित कृती कार्यक्रम निर्मिती, प्रभावी अंमलबजावणी.
प्रतिक्रिया
अध्यनस्तर निश्चितीसह चार टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन डाएट करते. गरजाआधारित, अध्यापनातील नवीन प्रवाहाबाबत आणि वेतनश्रेणीसाठीचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येते.
-आय. सी. शेख, प्राचार्य, डाएट कोल्हापूर.
विद्यार्थी, पालक संघटनांचे पदाधिकारी काय म्हणतात?
देशातील आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, आदी यंत्रणांचे मूल्यमापन, ऑडिट केले जाते. मग, शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन होण्यास काय हरकत आहे. शिक्षकांनी स्वत:हून आमचे मूल्यमापन करावे असे शासनाला सांगावे. शासनाने शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापनासाठी शिक्षण क्षेत्रातील उच्च अनुभव असलेल्या संस्थेची नियुक्ती करावी.
-रमेश मोरे, समन्वयक, शिक्षण वाचवा नागरी कृती समिती.
शिक्षकांच्या कामाचे बाह्य आणि अंतर्गत मूल्यमापन व्हावे. त्यातून त्यांची गुणवत्ता समजण्यास मदत होणार आहे. या मूल्यमापनातून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी काही नवीन उपक्रम राबविण्याची पाऊले शासनाला टाकता येतील.
-ऋतुराज माने, मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती.
नवी पिढी घडविण्याचे काम शिक्षकांच्या माध्यमातून होते. त्यांना वेतनही चांगले आहे. त्यांच्या कामाचे मूल्यमापन झाले पाहिजे. त्यांनी शिकविलेले विद्यार्थ्यांना कळते का? नाही हे शासनाला समजणे आवश्यक आहे.
-फिरोज सरगूर, सचिव, विद्यार्थी-पालक प्रवेश हक्क संरक्षण संघटना.
चौकट
नव्या धोरणात ‘डाएट’कडून प्रमाणीकरण
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या अध्यापनाच्या प्रमाणीकरणाची जबाबदारी ‘डाएट’ या संस्थेवर असणार आहे. या धोरणातील शिक्षक शिक्षण विभागात त्याची नोंद आहे.