पोर्ले धरणात तोल जाऊन महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: April 10, 2016 01:07 IST2016-04-10T01:07:50+5:302016-04-10T01:07:50+5:30
पती वाचला : नातेवाईकांकडून परतताना काळाचा घाला

पोर्ले धरणात तोल जाऊन महिलेचा मृत्यू
पोर्ले तर्फ ठाणे : येथील नातेवाइकांच्यातून जेवण करून यवलूज पोर्ले धरणावरून जाताना मोटारसायकलचा तोल जाऊन पाण्यात बुडून विवाहितेचा मृत्यू झाला. आदिती अमोल पाटील (वय २६, रा. वरणगे-पाडळी, ता. करवीर) असे मृत महिलेचे नाव आहे. तीन तासांच्या शोधाशोधीनंतर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. संबंधित घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पोर्ले तर्फ ठाणे येथे गुढीपाडवानिमित्त यात्रा असल्याने शनिवारी सायंकाळी अमोल बाबासो पाटील आपल्या पत्नीसह मोटारसायकलवरून नातेवाइकांकडून जेवण करून घरी जात होता. यवलूज पोर्ले धरणाजवळ आले असता त्यांच्या मोटारसायकलचा धरणावरून तोल गेला. मोटारसायकलसह दोघेही धरणाच्या बाजूच्या पाण्यात पडले. अमोल पोहता येत असल्याने तो वरती आला; पण अंधार असल्याने पत्नीला वाचविता आले नाही. अमोल अपघातात जखमी झाल्याने उपचारासाठी कोल्हापूरला नेण्यात आले. आदितीचा मृतदेह शोधण्यासाठी ग्रामस्थांना तीन तास लागले. यवलूज माहेर असलेल्या आदितीचा अमोल पाटील यांच्याशी वर्षापूर्वी विवाह झाला होता. अपघाताची वर्दी निटवडेच्या (ता. करवीर) पोलिसपाटील सविता पाटील यांनी करवीर पोलिसांना दिली. धरणाला संरक्षक कट्टा असता तर तिचा जीव वाचला असता.