दोन-तीन गल्ल्यांवर निवडून येण्याचे दिवस संपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:28 IST2021-09-23T04:28:18+5:302021-09-23T04:28:18+5:30
कोल्हापूर : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका त्रिसदस्यी प्रभाग रचनेवर आधारित घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने बुधवारी घेतल्यामुळे कोल्हापुरात गेल्या अनेक ...

दोन-तीन गल्ल्यांवर निवडून येण्याचे दिवस संपले
कोल्हापूर : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका त्रिसदस्यी प्रभाग रचनेवर आधारित घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने बुधवारी घेतल्यामुळे कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षांपासून दोन-तीन गल्ल्यातील ठरावीक मतदारांच्या जीवावर निवडून येण्याचे दिवस संपले आहेत. जो कार्यकर्ता आहे, ज्याच्याकडे विकासाची दृष्टी आहे आणि ज्यांना पक्षाचा पाठिंबा आहे, असेच उमेदवार निवडून येणार आहेत.
भाजप सरकारच्या काळात चौसदस्य प्रभाग रचना तयार करून काही महापालिकेत निवडणुका घेतल्या होत्या. त्याचा फायदा भाजपला होऊन चार महापालिकेत त्यांची सत्ता आली होती. पण हा निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्द केला होता. आता त्रिसदस्य प्रभाग रचना करण्याचा निर्णयही याच सरकारने बुधवारी घेतला.
या नव्या निर्णयामुळे महापालिकेत पक्षीय राजकारणाचा पाय अधिक घट्ट होण्याचा आशावाद निर्माण झाला आहे. तर दोन-तीन गल्लीतील ठरावीक मतदारांच्या जीवावर निवडून येण्याचे दिवस संपले आहेत. नव्या निर्णयामुळे सर्वच उमेदवारांचा कस लागणार आहे. अठरा हजार मतदारांसमोर जाऊन त्यांना निवडून यावे लागणार आहे. ज्यांचा मतदारांशी चांगला संबंध आहे, सामाजिक काम चांगले आहे, अशा कार्यकर्त्यांना आता चांगले दिवस आले आहेत.
एक सदस्यीय प्रभाग असताना आरक्षणाच्या जंजाळातून पुन्हा निवडून येऊ की नाही, याची शाश्वती नसायची. त्यामुळे नगरसेवकांकडून विकासाची कामे होत नसत. मतदारसंघात त्यांचा संपर्क कमी होत असायचा. परंतु आता विकासकामे करणारा नगरसेवक आणि त्यांचा राजकीय पक्षच निवडणुकीत टिकणार आहे.
प्रतिक्रिया -
पक्षीय राजकारणास बळ -
राज्य सरकारच्या निर्णयामुळे महानगरपालिकेतील पक्षीय राजकारणास बळ मिळणार आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे. एक प्रभाग एक नगरसेवक या रचनेमुळे काही कार्यकर्त्यांचे राजकीय करिअर संपत होते. पण नवीन निर्णयामुळे नगरसेवकांना किंवा चांगल्या कार्यकर्त्यांना पुढच्या निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळणार असल्याने तेही चांगल्या पद्धतीने काम करतील.
-सतेज पाटील, पालकमंत्री
-आता काय आवश्यकता होती-
त्रिसदस्य प्रभाग रचना करण्याची आताच काय आवश्यकता होती. मग भाजप सरकारने घेतलेला निर्णय रद्द करण्याचा आटापिटा का केला? हेच कळत नाही. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आम्ही हद्दवाढ करून निर्णय घ्या, अशी मागणी करतोय. पण राज्य सरकारने असा अचानक निर्णय घेतल्यामुळे काय चाललंय कळत नाही.
-आर. के. पोवार, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी
चांगल्या प्रतिमेचे उमेदवार निवडून येतील-
चांगला निर्णय झाला. पक्षीय पातळीवर निवडणूक होऊन महाविकास आघाडीला त्याचा लाभ होईल. तीन पक्षांनी प्रत्येक प्रभागात एक एक उमेदवार दिला तर तिन्ही पक्षाचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील. तीन-चार गल्ल्यांतील मतदारांच्या जीवावर निवडून येण्याचे प्रकार बंद होतील.
-ॲड. महादेवराव आडगुळे, माजी महापौर
खरा कार्यकर्ता टिकणार -
खरा कार्यकर्ता या निर्णयामुळे टिकणार आहे. यापूर्वी आरक्षणामुळे पुन्हा निवडून येण्याची शाश्वती नव्हती. त्यामुळे विकास होत नव्हता. आता नवीन निर्णयामुळे प्रभागाचा विकास होण्यास मदत होईल. ठरावीक गल्ल्यांवर पैसा खर्च करून निवडून येण्याचे प्रकार बंद होतील.
-संजय पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना
विकासात्मक निर्णय होतील-
भाजप सरकारने असा निर्णय घेतला होता, तो योग्यच होता. पण या सरकारने हा निर्णय पुन्हा घेतला. कोणीही उठून निवडणूक लढवायचा ते आता बंद होईल. विकासात्मक कामांचे निर्णय होतील, अशी अपेक्षा आहे.
-राहुल चिकोड, महानगर जिल्हाअध्यक्ष, भाजप