दलित वस्ती निधीचा वाद चिघळण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST2021-02-16T04:26:44+5:302021-02-16T04:26:44+5:30
कोल्हापूर : एकीकडे पंधराव्या वित्त आयोगाचा न्यायालयीन वाद अधिकृतपणे संपलेला नसताना दुसरीकडे दलित वस्तीचा आधीच ...

दलित वस्ती निधीचा वाद चिघळण्याची शक्यता
कोल्हापूर : एकीकडे पंधराव्या वित्त आयोगाचा न्यायालयीन वाद अधिकृतपणे संपलेला नसताना दुसरीकडे दलित वस्तीचा आधीच सुरू झालेला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. याच विषयावरून माणगावचे सरपंच राजू मगदूम यांनी जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्याशी सोमवारी वाद घातला. शासन आदेशाप्रमाणे याही निधीचे वाटप करावे, अशी मागणी त्यांनी घाटे यांच्याकडे केली.
दलित वस्ती निधीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला ३६ कोटी रुपये आले आहेत. याच निधीवरून पालकमंत्री सतेज पाटील आणि स्वाती सासने यांच्यात वाद झाला. नंतर सासने यांनी हा वाद संपल्याचेही जाहीर केले. मात्र, पालकमंत्री पाटील हे क्वारंटाईन असल्याने हा विषय अजून संपलेला नाही. अशातच जिल्हा परिषद सदस्या वंदना मगदूम यांचे दीर आणि माणगावचे नूतन सरपंच राजू मगदूम यांनी हातकणंगले तालुक्याला आलेल्या साडेसात कोटींच्या निधीचे वितरण कसे केले आहे याची माहिती घेतली. तेव्हा तालुक्यातील दोन सभापतींना प्रत्येकी एक कोटी, समाजकल्याण समिती सभापतींना ६० लाख आणि सदस्यांना केवळ ३५ लाख देण्याचा निर्णय झाल्याची माहिती त्यांना मिळाली. आपल्याला ५० लाख रुपये देण्याचा शब्द दिला होता; मात्र आता प्रत्येकजण यातून बाजू काढत असून, वेळ पडली तर पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा मगदूम यांनी दिला आहे.