दादा.. भ्रष्टाचारी ‘सायटर’ना दूर ठेवा!

By Admin | Updated: September 5, 2015 00:08 IST2015-09-05T00:08:40+5:302015-09-05T00:08:40+5:30

‘चाय पे चर्चा’मध्ये वकिलाचा डोस : महावीर गार्डनमध्ये नागरिकांनी मांडली विविध प्रश्नांची जंत्री

Dada .. Keep away the corrupt 'Sitter'! | दादा.. भ्रष्टाचारी ‘सायटर’ना दूर ठेवा!

दादा.. भ्रष्टाचारी ‘सायटर’ना दूर ठेवा!

कोल्हापूर : दादा, तुम्ही सरकारमध्ये प्रतिमुख्यमंत्री आहात. तुमच्यामार्फत कोणतेही काम शासनदरबारी गेले तर ते होणारच. मात्र, तुमच्या आसपास असणाऱ्या बगलबच्च्यांच्या (सायटर) भ्रष्टाचारामुळे खुद्द तुमचीही प्रतिमा खराब होत आहे. तुम्ही चारित्र्यवान आहात. त्यामुळे नजीकच्या काळात तुम्ही अशा लोकांना दूर करा, असा सल्ला शुक्रवारी सकाळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना खुद्द एका वकिलांनीच दिला. माईकवरून केलेल्या या सूचनेवरून कार्यक्रमात चांगलीच पंचायत झाली. दादांनाही त्याचे उत्तर देणे अवघड बनले. त्यामुळे या प्रश्नास त्यांनी बगल दिली.
महापालिका निवडणुकीतील ताराराणी आघाडी-भाजप, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यावतीने महावीर गार्डनमध्ये सकाळी सात वाजता ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष महेश जाधव, सुहास लटोरे, सुनील कदम, सुनील मोदी, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास सकाळी फिरायला आलेल्या मान्यवरांची गर्दी होती. लोक स्वत:हून माईकवर पालकमंत्र्यांना प्रश्न विचारत होते. दोन प्रश्न झाल्यानंतर बी. एस. पाटील म्हणाले, ‘आम्ही सर्किट बेंचच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, दादांच्याकडूनच तुम्ही या. आमच्या सरकारमधील ते प्रतिमुख्यमंत्री आहेत. एवढा मानसन्मान तुम्हाला पक्षात व सरकारमध्ये असताना तुमची प्रतिमा मलिन होऊ नये याची दक्षता घ्या.’
पाटील यांनी नागरी प्रश्न मांडण्याऐवजी थेट बगलबच्च्यांच्या भ्रष्टाचाराबद्दलच आरोप केल्याने खळबळ उडाली. श्रोत्यांत चुळबुळ झाली, परंतु हा विषय त्या सूचनेवरच संपला. पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे स्थापन केली जातील. डिसेंबर २०१५ मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन दिवसांचा महोत्सवही घेतला जाईल. महिलांसाठी शहरात १०० योग केंद्रे, ५३ लहान मुलांची ‘खेळघरे’ स्थापन केली जातील. यामध्ये ४५ मिनिटे खेळ आणि ४५ मिनिटे अभ्यास घेतला जाणार आहे. अशा प्रकारचे केंद्र सध्या जागृतीनगर येथे सुरू आहे. तसेच बेरोजगारांना तिन्ही औद्योगिक वसाहतींमधील रेमंड, किर्लोस्कर, आदी कंपन्यांत नोकरीची संधी देऊ.
चर्चेत माजी उपमहापौर उदय पोवार, राजेंद्र कडूदेशमुख, अनिल शिंदे, नारायण कांझर, आदींनी सहभाग घेतला. महावीर गार्डन हास्य क्लब, रिंग क्लब यांच्यासह मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही या चर्चेत सहभाग घेतला.

भ्रष्टाचाऱ्यांची गय नाही
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात आतापर्यंत २०० भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरी घालविले; तर अनेक वर्षे बढती नसलेल्या ७०० जणांना एकाच वेळी बढती दिली. एक हजार जणांच्या बदल्या केल्या. या बदल्यांबद्दल एकाने मला ‘भुजबळांसारखे तुम्ही मिळवले असते, तर तुमच्या महापालिकेचा अर्थसंकल्प झाला असता,’ असे हिशेब करून सांगितले. महापालिकेत निवडून देणाऱ्या नगरसेवकाने भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले तर त्याला तत्काळ राजीनामा द्यायला लावू, अशी ग्वाहीही पालकमंत्री पाटील यांनी दिली.
...तर मालक मरून जाईल!
महापालिकेचा विकास आराखडा मंजूर करताना नागरिकांसमोर ठेवावा. कारण ‘आयआरबी’सारखे प्रकल्प आपल्या डोक्यावर बसले आहेत. याशिवाय महापालिकेने जुन्या घरांना घरफाळा नव्या रेडीरेकनरप्रमाणे लावला आहे. यामध्ये जुन्या घरांचा घसारा धरलेला नाही. त्यामुळे अशी घरफाळा वसुली केली तर मालक मरून जाईल, अशी कैफियत सुनील डुणुंग यांनी मांडली.

Web Title: Dada .. Keep away the corrupt 'Sitter'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.