सक्षम, सुसंस्कारित समाज घडवायचाय

By Admin | Updated: December 17, 2014 23:11 IST2014-12-17T20:40:33+5:302014-12-17T23:11:38+5:30

आरोग्य, शिक्षण आणि संस्कार यावर काम करणार : डी. ए. पाटील--थेट संवाद

To create a capable, well-cultured society | सक्षम, सुसंस्कारित समाज घडवायचाय

सक्षम, सुसंस्कारित समाज घडवायचाय

संघटनेच्या अस्तित्वामुळे समाज निर्भय होतो. सामर्थ्यशाली व स्वाभिमानी होतो. अन्यायाविरुद्ध संघटितपणे लढण्याची शक्ती येते. हाच अनुभव लक्षात घेऊन दक्षिण भारत जैन सभा अनेक वर्षांपासून समाजात काम करत आहे. सुसंस्कारित समाज घडविण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. विद्यार्थ्यांना चांगले आरोग्य मिळाले, तर त्यांचा बौद्धिक विकाससुद्धा उत्तम होऊ शकतो. बौद्धिक विकासाबरोबरच संस्कार झाले तर चांगला समाज निर्माण होऊ शकतो, यावर आमचा विश्वास असल्यामुळेच यापुढच्या काळात आम्हाला आरोग्य, शिक्षण आणि संस्कार यावर चांगले काम करायचे आहे, असे प्रतिपादन दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन प्रा. डी. ए. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. दक्षिण भारत जैन सभेचे ९४ वे त्रैवार्षिक अधिवेशन २० व २१ डिसेंबर असे दोन दिवस कोल्हापुरात होत आहे. या अधिवेशनास सुुमारे दहा हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. धार्मिक व परोपकारी वृत्ती, निर्व्यसनी, सुसंस्कारीत समाज अशी ओळख असलेल्या जैन समाजाच्या दक्षिण भारत जैन सभेच्या कार्यालयाची जाणीव करून देण्यासाठी प्रा. डी. ए. पाटील यांच्याशी केलेली ही थेट बातचित!


प्रश्न : दक्षिण भारत जैन सभा कधी स्थापन झाली व तिचा हेतू काय होता?
उत्तर : दक्षिण भारत जैन सभेची स्थापना दि. ३ एप्रिल १८९९ मध्ये स्तवनिधी येथे झाली आहे. जैन समाजाची ही एक प्रातिनिधीक संस्था म्हणून शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहिली आहे. सभेच्या स्थापनेच्या काळात जैन समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या खूपच मागासलेला होता. धार्मिक क्षेत्रात कुरूढीने वेढलेला होता. शहरी भागातील समाज थोडा व्यापार उद्योगात धडपडत होता मात्र, ग्रामीण भागात मात्र मोलमजुरी व अल्पशेतीवर गुजराण करत होता. ‘ना शिक्षण ना प्रतिष्ठा’ अशा अवस्थेत जैन समाज कसातरी टिकून होता. समाजाची गरज ओळखून तो शिक्षित व्हावा, यासाठी समाजधुरिणांनी सभेची स्थापना केली.
प्रश्न : कामाला कशाप्रकारे सुरुवात झाली ?
उत्तर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन सभेने सुरुवातीला शहरी भागात प्रथम वसतिगृहे चालू केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येऊन शिक्षण घेता यावे, हा त्यामागचा हेतू होता. अल्पखर्चात जेवण व राहण्याची सुविधा वसतिगृहांच्या माध्यमातून सुरू केली.
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि गरज लक्षात घेत वसतिगृहांची संख्या वाढत गेली. सध्या कोल्हापूर, सांगली, बेळगांव, हुबळी, इचलकरंजी यासह कर्नाटकातही मुलांची वसतिगृहे सुरू आहेत. सांगली, कोल्हापूर, कागल, औरंगाबाद येथे मुलींची वसतिगृहेसुद्धा चालविली जातात.
प्रश्न : किती शाळा चालविल्या जात आहेत ?
उत्तर : सभेच्यावतीने कोल्हापूर, सांगली, जळगाव आदी ठिकाणी चार शाळा चालविल्या जातात. या शाळांतून १७०० विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. अंबड जळगांव येथे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली असून, तेथे नर्सरी ते दहावीपर्यंत ९०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यासाठी ३६ खोल्यांची तीनमजली इमारत संस्थेने उभी केली आहे. अलीकडेच बुधगाव येथे वीर सेवादलामार्फत लिटल स्टार इंग्लिश स्कूल सुरू केले आहे.
प्रश्न : सभेच्या कार्यक्षेत्राबाबत थोडी माहिती सांगा.
उत्तर : सभेचा कार्यविस्तार सांगली, कोल्हापूर, उत्तर कर्नाटक व मराठवाडा अशा मर्यादित स्वरुपात न राहता तो मुंबई, कोकण, गोवा येथेही झाला आहे. या विभागातही अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्याध्ये धर्मक्षेत्र रक्षण, नियतकालिक, आर्थिक संस्थेमार्फत अर्थसहाय्य, विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण, समाजातील सेवाभावी कार्यकर्त्यांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात येतो.
प्रश्न : विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कशी दिली जाते.
उत्तर : सभेने सुरुवातीपासूनच शिक्षणाकडे जबाबदारीने लक्ष दिले आहे. वसतिगृहातील व बाहेरील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची तरतूद केली आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी सभेने १ कोटी ३५ लाखांचा निधी जमविला आहे, त्याच्या व्याजातून ही शिष्यवृत्ती देण्यात येते. आजअखेर हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. नुकतीच सभेने ‘लक्ष-लक्ष शाश्वत शिष्यवृत्ती योजना’ अमलात आणली आहे.
प्रश्न : अन्य शाखांचे कामकाज कसे चालते?
उत्तर : सभेची वीर सेवादल ही युवकांची शाखा असून तिची स्थापना १९७९ मध्ये झाली आहे. यामध्ये युवकांना सामावून घेण्यात आले असून त्यांच्यामार्फत २०० पाठशाळांतून युवापिढीवर संस्कार व व्यसनापासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येते.
शाकाहार, वृक्षारोपण याचे महत्त्वही सांगितले जाते. वीर महिला मंडळ शाखेने धार्मिक विभागात जनजागरणाचे काम हाती घेतले
आहे. स्त्री भ्रूणहत्याबाबत जनजागृतीचे काम चांगल्या पद्धतीने केले आहे. पदवीधर संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले जाते.
- भारत चव्हाण

Web Title: To create a capable, well-cultured society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.