कुत्र्याच्या भुंकण्यावरून खडकेवाडा येथे हाणामारी
By Admin | Updated: April 10, 2016 01:16 IST2016-04-10T01:16:30+5:302016-04-10T01:16:30+5:30
दहाजण जखमी : पाच गंभीर; घरावर दगडफेक; बंदुकीचा वापर करून दहशत माजविण्याचा प्रयत्न !

कुत्र्याच्या भुंकण्यावरून खडकेवाडा येथे हाणामारी
मुरगूड : कागल तालुक्यातील खडकेवाडा येथे कुत्र्याच्या भुंकण्यावरून भोसले आणि कदम कुटुंबीयात जोरदार हाणामारी झाली. मारामारीत काठ्या, गज, चटणीचा वापर झाला. यात दहाजण जखमी झाले असून, यातील पाचजण गंभीर आहेत. यावेळी कदम कुटुंबीयांनी बंदुकीचा वापर करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यामध्ये नोंद घेण्याचे काम सुरू होते.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, खडकेवाडा पैकी कदमवाडी परिसरात अशोक गुंडू भोसले आपल्या कुटुंबीयांबरोबर राहतात. घर शेतवडीत असल्याने त्यांनी संरक्षणासाठी कुत्रा पाळला आहे. त्यांच्या दारावरून जयवंत पुंडलिक कदम हे आपल्या घराकडे ये-जा करीत असताना त्यांना कुत्रा भुंकतो, अंगावर धावून येतो या कारणास्तव चार दिवसांपूर्वी वाद झाला होता; पण गावचे पोलिसपाटील आप्पासाहेब पोवार यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला होता.
शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास अशोक भोसले यांचा नववीत शिकणारा मुलगा आकाश खेळण्यासाठी आपल्या मित्रांना बोलविण्यास गेला असता कदम कुटुंबीयांनी त्याला जोरदार मारहाण केली. यात त्याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. ही घटना आकाशच्या घरी समजल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास अशोक भोसले पोलिसपाटलांसह जयवंत कदम याला जाब विचारण्यास गेले. त्या ठिकाणी वादावादी होऊन दोन्ही कुटुंबामध्ये जोरदार मारामारी झाली. यामध्ये आकाश अशोक भोसले (वय १६), सुजाता अशोक भोसले (३२, रा. खडकेवाडा) व दीपक मारुती चिंदगे (२९, रा. सौंदलगा) तसेच जयवंत कुंडलिक कदम, मुक्ताबाई कुंडलिक कदम हे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय सुवर्णा जयवंत कदम, कुंडलिक अप्पा कदम, माधुरी शेंडुरे, गीता बळू भोसले व संगीता शिवाजी भोसले हे पाचजण किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान, जयवंत कदम यांनी हातामध्ये बंदूक घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भोसले कुटुंबीयांनी केला असून, आपल्या घरावर प्रचंड दगडफेक करून आपल्याला जिवे मारण्याचा प्रयत्न भोसले कुटुंबाने केल्याचा आरोप जयवंत कदम यांनी पोलिसांसमोर केला आहे. दोन्ही कुटुंबीयांकडून परस्परविरोधी तक्रारी देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत अधिक तपास सहा. पोलिस उपनिरिक्षक गणेश कवितके, युवराज राणे, आदी करीत आहेत.