संविधानामुळेच देश सुरक्षित : डॉ. गणेश देवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST2021-02-05T07:01:13+5:302021-02-05T07:01:13+5:30
घानवडे (ता. करवीर) येथे पवार-पाटील संस्थेच्यावतीने दिनकरराव पवार-पाटील स्मृतिदिन समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. गणेश देवी बोलत होते. ...

संविधानामुळेच देश सुरक्षित : डॉ. गणेश देवी
घानवडे (ता. करवीर) येथे पवार-पाटील संस्थेच्यावतीने दिनकरराव पवार-पाटील स्मृतिदिन समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. गणेश देवी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केरबा पाटील होते.
सद्य राजकीय स्थितीचा ग्रामीण भागांतील शैक्षणिक जीवनावरील परिणाम याविषयी मार्गदर्शन करताना पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी सामाजिक विषयांवर परखड मत व्यक्त केले. शेती, शेतकरी, भाषा व शिक्षण यांचा गेल्या अकरा हजार वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास त्यांनी मांडला. देशभरात गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव करून शिक्षण दिले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सध्याची शिक्षणनीती व दिल्ली येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदाेलन याबद्दल केंद्र शासनावर त्यांनी खरपूस टीका केली. संविधान तोडायचे काम करणारे गुजरातमधील दोन नेते देश विकायला चाललेत तर दोन नेते देश खरेदी करताहेत, अशीही टीकाही त्यांनी यावेळी केली.
माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी स्वागत केले. राधानगरी आणि करवीर तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व गुणवंत विद्यार्थी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सुरेखा देवी यांनी घानवडेसारख्या डोंगराळ व ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाकरिता वसतिगृहाची सुविधा केल्याबद्दल पवार-पाटील विद्यालयाचे कौतुक केले. यावेळी अशोकराव पवार-पाटील, प्राचार्य शिवाजी चव्हाण, बाबासो देवकर, शंकर पाटील (रा. म्हालसवडे) अमित कांबळे, बळवंत पाटील, शामराव गावडे उपस्थित होते.