कोथिंबिरीच्या पेंढ्या पाचला दोन !
By Admin | Updated: February 20, 2017 00:20 IST2017-02-20T00:20:51+5:302017-02-20T00:20:51+5:30
उपवासाच्या पदार्थांना मागणी : आठवडाभरात भाज्यांच्या दरामध्ये किंचितशी वाढ

कोथिंबिरीच्या पेंढ्या पाचला दोन !
कोल्हापूर : इतरवेळी ग्राहक बाजारातून कोथिंबिरीची पेंढी २५ किंवा १५ रुपयांना याप्रमाणे आणतो; पण कोल्हापुरातील रविवारच्या आठवडी बाजारात ‘पाच रुपयांना दोन कोथिंबिरीच्या पेंढ्या,’ असा आवाज कानांवर पडताच, तिथे कोथिंबिरीची पेंढ्या घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र होते. त्यातच शाबू, वरीसह उपवासाच्या अन्य पदार्थांनाही मागणी वाढली आहे.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात भाज्यांच्या दरात किंचितशी वाढ होऊ लागली आहे. नोटाबंदीच्या काळात भाज्यांचे दर अक्षरश: कोसळले होते. हे दर सरासरी २० रुपये प्रतिकिलोच्या घरात गेले होते. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ढबू मिरची, गवार, वरणा, काकडी, दुधी भोपळा, पडवळ, पोकळा, बीट व कांदापातीच्या दरांमध्ये किंचितशी वाढ झाली आहे; तर वांगी, भेंडी, दोडका, रताळी, शेवग्याची शेंग, माईनमुळ्याचे दर उतरले आहेत.
त्याचबरोबर कांदा-बटाट्याचे दर स्थिर आहेत. कांद्याचा दहा किलोंचा दर ६५, तर बटाटा ८० रुपयांच्या जवळपास गेला आहे; पण लसणाचा दर तब्बल ३००
रुपयांनी कमी होऊन ६०० रुपये झाला आहे.
दुसरीकडे, उडीदडाळ ९० वरून १०० रुपये प्रतिकिलो झाली आहे. हरभराडाळ ८० वरून ९० रुपये झाली. महाशिवरात्र असल्यामुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे.
शाबू ८० वरून ९० रुपये प्रतिकिलो; तर वरी ८० रुपये झाली आहे. तसेच राजगिरा लाडू या उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली
आहे.
दरम्यान, मोेसंबी, माल्टा, संत्री, सफरचंद, अंजीर, अननस, कलिंगडे, बोरे, पपई, कैरी, किव्ही, रामफळ, स्ट्रॉबेरी व हापूस आंब्यांत वाढ, तर चिकू उतरला आहे.