कोरोना संकटात उजळाईवाडीच्या महिला बनल्या आत्मनिर्भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST2021-04-30T04:30:11+5:302021-04-30T04:30:11+5:30
मोहन सातपुते उचगाव : कोरोना संकटात अनेकांचे रोजगार हिरावले, व्यवसाय बंद पडले. मात्र, अशा अडचणीच्या काळातही त्या घट्ट ...

कोरोना संकटात उजळाईवाडीच्या महिला बनल्या आत्मनिर्भर
मोहन सातपुते
उचगाव : कोरोना संकटात अनेकांचे रोजगार हिरावले, व्यवसाय बंद पडले. मात्र, अशा अडचणीच्या काळातही त्या घट्ट पाय रोवून उभ्या आहेत...संसाराचा गाडाही हाकतात अन् अनेकांना आत्मनिर्भरतेची वाटही दाखवतात...कारण, १५ वर्षांपूर्वी एकीचे बळ दाखवत त्यांनी रोवलेली आत्मनिर्भरतेची मुहूर्तमेढच त्यांना या संकटाच्या काळात धावून आली आहे. विविध उत्पादनांची निर्मिती करून त्यांची विक्री करत शेकडो हात आत्मनिर्भरतेचा गजर करत आहेत. उजळाईवाडी (ता.करवीर) येथील यशस्विनी महिला मंडळाच्या शेकडो महिलांनी निर्माण केलेली ही यशोगाथा अनेकासांठी प्रेरक ठरत आहे. एखादे संकट आपल्यासाठी नेहमीच संधी घेऊन येते, असे म्हणतात. याच संकटाचे संधीत रूपांतर करण्याची किमया उजळाईवाडीतील १३ महिला बचत गटांतील महिलांनी साधली आहे. या विविध तेरा बचत गटांतील महिलांना येथील यशस्विनी महिला मंडळाने एकाच धाग्यात गुंफत त्यांना आत्मनिर्भरतेची वाट दाखवल्याने या महिला कोरोनाच्या संकटातही एकीचे बळ घेत आपल्या संसाराचा गाडा मोठ्या नेटाने हाकत आहेत. उजळाईवाडी (ता.करवीर) येथील यशस्विनी महिला मंडळाच्या माध्यमातून २००६ मध्ये स्वयंसाहाय्यता समूह गटाची स्थापना करण्यात आली. एकमेकींच्या अडचणी समजून घेतानाच या महिलांनी स्वत:साठीही आपली एक वेगळी वाट शोधली. यातून या महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी विविध प्रशिक्षणे दिली गेली. त्यामुळे याच प्रशिक्षणाचा या महिलांनी लॉकडाऊन काळात लाभ उठविला. लॉकडाऊन काळात उभा देश कुलूपबंद असताना या महिलांनी मात्र, लोणची, मसाले, चटणी, पिठाचे पापड बनवत त्यांची विक्री केली. यातून या महिलांना आर्थिक लाभ तर झालाच, शिवाय घरबसल्या रोजगारही मिळाला. काही जणींनी घरच्या घरी खानावळ सुरू करून अर्थार्जनाचा मार्ग स्वीकारला. अनेक महिलांनी आपण कोणत्याच कामात कमीपणा मानायला नको ही मानसिकता ठेवत इस्त्री काम, भाजीपाला, किराणा दुकान, पिठाची गिरणीही चालविली. यातून या महिला आत्मनिर्भर बनत गेल्या. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात मास्कला सर्वाधिक मागणी होती. ही गरज ओळखून या महिलांनी मास्कची निर्मिती करत त्याचीही मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे. हे मास्क सरकारी कार्यालये, खाजगी संस्था, मेडिकल्स आणि ग्रामपंचायतींकडे वितरित करत आहेत. यापूर्वी या महिलांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, नेत्रदान शिबिर, वृक्षारोपण, १६ वर्षे स्मशान भूमीला शेणी व तिरडीदान, एकत्र कुटुंब पद्धतीसाठी संवाद, स्वछता अभियान यासारखे उपक्रम राबविले आहेत.
या बचत गटातील शालन पोवार, शुभांगी पोवार, सारिका कासारकर, अनुसया भोसले, वृषाली चव्हाण, स्मिता हचनाळे, सुरेखा साळोखे, संगीता बारड, स्मिता गोंजाले ,माधुरी परीट, योगिता इंगळे, यशवंता गरड, प्रीती तावडे, सुजाता पाटील, प्रिया चौगुले, संजीवनी माने, पुष्पा बोंद्रे, वैशाली नलवडे, इंदूबाई दळवी, सविता चोगुले, मंगल शिंदे, सुनीता गाडेकर, मंगल पाटील, संध्या भोसले, प्रिया घेवडे अश्या कित्येक महिला आत्मनिर्भर होऊन घराला घरपण देत प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुढे होत आज स्वयंरोजगार मिळवत आहेत.
कोट : २००६ साली उजळाईवाडी येथे आम्ही एकत्र आलो. सुरुवातीला बचत गट स्थापन केले. त्यातून स्वयंसाहाय्यता निर्माण होत गेली. बचत गट एकमेकींच्या साहाय्याने पुढे सरकत गेला. घरचे आर्थिक प्रश्न सोडवणूक करत बचत गटाची कर्जेही फेडत धाडसाने पुढे आल्या. आज त्या आत्मनिर्भर बनून इतर महिलांना सहभागी करत आधार देऊ लागल्या. लॉकडाऊन झाले तरी त्या खंबीरपणे उभ्या आहेत.
शैलजा भोसले, मराठा महासंघ, महिला जिल्हाध्यक्षा