दुसरा डोस घेतल्यानंतरही ५५६ जणांना कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST2021-06-16T04:33:32+5:302021-06-16T04:33:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ पहिला डोस घेऊन भागणार नसल्याचे जिल्ह्यातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ...

दुसरा डोस घेतल्यानंतरही ५५६ जणांना कोरोना
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा केवळ पहिला डोस घेऊन भागणार नसल्याचे जिल्ह्यातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झालेल्यांपैकी १४३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा डोस घेतल्यानंतरही ५५६ जणांना पुन्हा कोरोना झाला. परंतु मृत्यू त्यांना टाळता आला आहे. त्यामुळेच दुसरा डोस घेणाऱ्यांनी न चुकता हा डोस घेण्याची गरज आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये अनेकांनी लस घेण्यासाठी नकार दिला. सोशल मीडियावरून याबाबत अनेक चुकीचे संदेश प्रसारित होत होते. त्याचाही धसका अनेकांनी घेतला. सीपीआरसारख्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीदेखील दुसरा डोस घेतल्यानंतर कोणावर काय परिणाम होतोय ते पाहून आपण लस घेऊ या, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये शंका होती. परंतु वैद्यकीय क्षेत्रातून आणि प्रशासनाकडून वारंवार लसीचे महत्त्व विशद केले जात होते. १ जानेवारी २१ ते १३ जून २१ पर्यंतचा आढावा घेता लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही ३ हजार ४३७ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी १७५५ जण पुन्हा रुग्णालयात दाखल झाले. तर त्यांच्यापैकी १४३ जणांचा मृत्यू झाला. दुसरा डोस घेतल्यानंतर ५५६ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ३२० जण पुन्हा रुग्णालयात दाखल झाले. तर त्यांच्यापैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही. हे सर्वांत महत्त्वाचे आहे.
चौकट
१ जानेवारी १३ जून २१ पर्यंतची स्थिती
लसीकरण झालेले लाभार्थी- १२ लाख ७ हजार ४८
आतापर्यंतचे बाधित रुग्ण- ८२ हजार ६११
लसीकरणानंतर बाधित झालेले- ३ हजार ९९३
पहिला डोस घेतल्यानंतर बाधित- ३ हजार ४३७
पहिला डोस घेतल्यानंतरही मृत्यू- १४३
दुसरा डोस घेतल्यानंतर बाधित- ५५६
दुसरा डोस घेतल्यानंतर मृत्यू- ००
कोट
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोनाची पुन्हा लागण होत नाही, असा कुठेही दावा करण्यात आलेला नाही. पुन्हा कोरोना होऊ शकतो; परंतु त्याची तीव्रता या लसीकरणामुळे कमी होते, हे मात्र ठामपणे सांगितले जात होते. पहिल्या डोसबरोबरच दुसरा डोस महत्त्वाचा असल्याने गेल्या दोन महिन्यांत अधिकाधिक दुसरा डोस देण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या डोसनंतर न झालेले मृत्यूच या डोसचे महत्त्व स्पष्ट करतात.
-डाॅ. उषादेवी कुंभार, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी