रस्त्यांच्या मूल्यांकनावर मतैक्य व्हावे
By Admin | Updated: August 22, 2015 01:06 IST2015-08-22T01:06:24+5:302015-08-22T01:06:24+5:30
कृती समितीची अपेक्षा : टोल रद्द होईपर्यंत वसुली नकोे; एन. डी. पाटील

रस्त्यांच्या मूल्यांकनावर मतैक्य व्हावे
कोल्हापूर : आयआरबीने शहरात केलेल्या रस्त्यांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. मूल्यांकनाच्या बाबतीत कोणतीही कसूर राहिलेली नाही. आयआरबी, नोबेल कंपनी आणि सर्वपक्षीय कृती समिती यांनी केलेल्या मूल्यांकनाबाबत मतैक्य व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत राज्य सरकारने आता लवकरात लवकर टोल रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले तर टोल रद्द होईपर्यंत आता वसुली केली जाऊ नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
राज्य सरकारने नियुक्त केलेल्या मूल्यांकन समिती, नोबेल कंपनी आणि सर्वपक्षीय कृती समितीने केलेले मूल्यांकन आयआरबी कंपनीने अमान्य केले होते. त्यामुळे ‘आयआरबी’च्या म्हणण्याप्रमाणे टेंडरमधील दराप्रमाणे
मूल्यांकन करण्याची सूचना राज्य सरकारने केली होती.
त्यानुसार कृती समितीने हे मूल्यांकन करून त्याचा अहवाल गुरुवारीच सादर केला. त्याचे मूल्यांकन २५९ कोटी ७४ कोटी केले असून न केलेली कामे आणि चुकीच्या कामांचे मूल्य १२० कोटी ३९ लाख रुपये वजा जाता आयआरबीला फक्त १३९ कोटी ३५ लाख रुपये आणि त्यावरील व्याजाची रक्कम द्यावी लागणार आहे. नोबेल कंपनीच्या सर्वेक्षणावर आधारित डीएसआरप्रमाणे रस्त्यांचे मूल्यांकन २३९ कोटी ६२ लाख रुपये इतके झाले होते. त्यातील अपूर्ण कामे, चुकीची कामे याची किंमत वजाजाता १५८ कोटी २६ लाख रुपये द्यावे लागतील, असे पूर्वीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता १५८ कोटी २६ लाख आणि १३९ कोटी ३५ लाख अशा दोन रकमांवर मूल्यांकन येऊन थांबले आहे.
आर्किटेक्ट असोसिशएनचे राजेंद्र सावंत यांनी या मूल्यांकनाबाबतची सविस्तर माहिती शुक्रवारी पत्रकार व कृती समितीच्या सदस्यांना दिली. ‘आयआरबी’ने केलेले सर्व दावे या मूल्यांकनाच्या माध्यमातून खोडून काढले असून अनेक बाबी आयआरबीला मान्य करणे भाग पडले असल्याचे सावंत यांनी सांगितले. जागेवरील मापे, डांबराचे नमुने,कॉँक्रीटचा दर्जा याबाबतचे सर्व दावे आपण चुकीचे ठरविल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी रामभाऊ चव्हाण, दिलीप पवार, बाबूराव कदम, पंडितराव सडोलीकर, बाबा पार्टे, बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, लाला गायकवाड, गणी आजरेकर, भगवान काटे, चंद्रकांत यादव, दीपा पाटील, वैशाली महाडिक, बाबा महाडिक, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)