महाडिक-सतेज व मालोजीराजेंना एकत्र आणण्यासाठी बैठक घेणार
By Admin | Updated: August 10, 2015 01:07 IST2015-08-10T01:07:57+5:302015-08-10T01:07:57+5:30
पी. एन. पाटील : महापालिकेसाठी रणनीती २० आॅगस्टला ठरणार

महाडिक-सतेज व मालोजीराजेंना एकत्र आणण्यासाठी बैठक घेणार
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रितपणे लढणे आवश्यक आहे. ते लक्षात घेऊन २० आॅगस्टच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी आमदार महादेवराव महाडिक, माजी मंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची एकत्रितपणे बैठक घेणार असल्याची माहिती कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी दिली. क्रांतिदिनानिमित्त काँग्रेस कमिटीमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण उपस्थित होते. शहराध्यक्ष चव्हाण म्हणाले, महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निवडीचे अधिकार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्थानिक पातळीवर कोणत्याही एका व्यक्तीला दिलेले नाहीत. याबाबत जिल्ह्यातील नेते-पदाधिकारी सामूहिकपणे निर्णय घेतील. उमेदवार हे काँग्रेस कमिटीतच ठरविले जातील. शिवाय प्रदेश चिटणीस सुरेश कुऱ्हाडे यांनी या अनुषंगाने जाहीर केलेल्या मताशी जिल्हा काँग्रेस सहमत नाही. देशात ज्याप्रमाणे क्रांती घडली अशी क्रांती आगामी निवडणुकीमध्ये घडवून महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकाविण्यासाठी काँग्रेसजनांनी कार्यरत राहावे.
पी. एन. पाटील म्हणाले, राजीव गांधी जयंतीनिमित्त २० आॅगस्टला काँग्रेसतर्फे ‘सद्भावना दौड’चे आयोजन केले आहे. यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, आमदार पतंगराव कदम, माजी मंत्री रमेश बागवे, सत्यजित देशमुख प्रमुख उपस्थित राहणार आहे. त्यांच्या उपस्थितीत दिंडनेर्ली (ता. करवीर) येथे सकाळी मेळावा होईल. त्यानंतर दुपारी चार वाजता जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होईल. यामध्ये महानगरपालिका निवडणुकीबाबतची रणनीती निश्चित केली जाणार आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस एस. के. माळी, महिला व बालकल्याण समिती सभापती लीला धुमाळ, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सामूहिकपणे निर्णय
महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस सर्व ताकदीनिशी उतरणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी देण्याबाबत सामूहिकपणे निर्णय घेतला जाईल. उमेदवार हे काँग्रेस कमिटीमध्येच ठरविले जातील, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी दिली.