कंत्राटी कामगार आले रस्त्यावर

By Admin | Updated: July 17, 2014 00:15 IST2014-07-17T00:07:47+5:302014-07-17T00:15:23+5:30

‘महावितरण’च्या धोरणाचा परिणाम : कंत्राटी कामगारांना तुटपुंजा पगार

Contract workers came on the streets | कंत्राटी कामगार आले रस्त्यावर

कंत्राटी कामगार आले रस्त्यावर

शिवाजी सावंत - गारगोटी
महावितरण कंपनीने नवीन कामगार भरती करताना कंत्राटी कामगारांबाबत ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ हे धोरण अवलंबल्याने हजारो कंत्राटी कामगार रस्त्यावर आले आहेत.
महावितरण कंपनीने सुमारे दहा वर्षांपासून कंत्राटी कामगार नेमले आहेत. संपूर्ण राज्यात दहा हजार कंत्राटी कामगार तीन हजार ते पाच हजार रुपये एवढ्या तुटपुंज्या पगारावर ‘कायम होऊ’ या आशेवर काम करीत आहेत; पण महावितरण कंपनीने नवीन भरती करताना अनुभवी कंत्राटी कामगारांना वगळून दहावीच्या टक्केवारीवर नवीन नेमणुका केल्या आहेत. पूर्वीच्या दहावीच्या लोकांना टक्केवारी कमी असल्याने ते स्पर्धेतून बाहेर पडले. नवीन भरतीमध्ये महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. या महिलांची भरती दुरुस्ती विभागाकडेही केली आहे. त्या महिलांना लाईनमनचे काम करावे लागते. विद्युत खांबावर चढण्यासाठी विवाहित महिला आपल्या पतिराजांचा आश्रय घेत आहेत. तेव्हा कंपनीने या महिलांची इतरत्र बदली करणे आवश्यक आहे.
भरती करण्यापूर्वी सुमारे दहा वर्षे कायम कर्मचारी कमी होते तेव्हा कंत्राटी कामगारांची भरती केली. यात या कामगारांनी सर्व कामे केली. पगार कमी असतानाही इमाने-इतबारे कंपनीची सेवा केली. कारण कंपनी आपला सहृदयतेने विचार करून सेवेत ‘कायमस्वरूपी’ सामावून घेईल. अनेक कंत्राटी कामगारांनी काम करताना आपला जीव गमवला आहे, तर उर्वरित मजुरांचा विचार न करता सर्व कंत्राटी कामगारांचे संसार उघड्यावर पाडले आहेत.
या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजित पवार यांची भेट घेतली असता त्यांनी कंपनी व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांना सूचना दिल्या व शिष्टमंडळाला आश्वासन दिले. उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याने संघटना सुखावली होती; पण कंपनीने त्यांच्या सूचनांना कवडीचीही किंमत दिली नसल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले. ‘रोख-ठोक उपमुख्यमंत्री’ अशी ज्यांची ख्याती आहे, त्यांनाही कंपनीने जुमानले नसल्याचे दिसते.
पात्रतेबरोबर योग्यता असणे आवश्यक असते. केवळ टक्केवारी न पाहता अनुभव पाहणे आवश्यक आहे. अन्यथा, नवीन भरतीतील अनेक कामगारांनी जीव गमावला आहे.
कंपनीच्या दुटप्पी धोरणामुळे आमचा बळी जात आहे. वेळोवेळी आम्ही निवेदने देऊनसुद्धा केवळ आश्वासने मिळाली प्रत्यक्षात काहीही नाही.
- विजय मोरे, अध्यक्ष, भुदरगड तालुका कंत्राटी कामगार संघटना.

Web Title: Contract workers came on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.