एकाच ट्रॅक्टरचे ३ कारखान्यांकडे करार, शेतकरी गपगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:20 IST2021-01-09T04:20:52+5:302021-01-09T04:20:52+5:30

लोगो : खुशाली नव्हे खंडणी शरद यादव कोल्हापूर : जिल्ह्यात अनेक ट्रॅक्टर मालकांनी २ ते ३ साखर कारखान्यांकडे ...

Contract of the same tractor to 3 factories, farmers gossip | एकाच ट्रॅक्टरचे ३ कारखान्यांकडे करार, शेतकरी गपगार

एकाच ट्रॅक्टरचे ३ कारखान्यांकडे करार, शेतकरी गपगार

लोगो : खुशाली नव्हे खंडणी

शरद यादव

कोल्हापूर : जिल्ह्यात अनेक ट्रॅक्टर मालकांनी २ ते ३ साखर कारखान्यांकडे ऊस वाहतुकीचे करार केले आहेत.त्यामुळे ऊस तोडल्यानंतर एकाच कारखान्याला आपला ऊस जाईल,असे छातीठाेकपणे शेतकरी सांगू शकत नाही. त्याचबरोबर ऊस वाहनात भरल्यानंतर शेतकऱ्यांना पोहोच देण्याची पद्धत होती. आता नव्या जमान्यात अनेक कारखान्यांनी पोहोच देणेच बंद केले आहे. यामुळे ऊस वजनात काही गफलत झाली तर शेतकऱ्यांनी दाद कशाच्या आधारावर मागायची, या प्रश्नाचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही.

जिल्ह्यात काही ट्रॅक्टर मालकांनी साखर कारखान्यांची यंत्रणा हाताशी धरून एकाच वेळी २ ते ३ कारखान्यांकडे करार केले आहेत. जास्तीत जास्त ऊस ओढण्यासाठी आम्ही असे करत असल्याचे ते सांगत असले तरी याच्यामागे त्यांचा हेतू शुद्ध दिसत नाही.

ऊसतोड सुरू झाल्यानंतर अमूक एका कारखान्याकडे तुमचा ऊस जाणार असल्याचे सांगितले जाते.ऊस वाहनात भरून रस्त्यावर आला की संबंधित कारखान्याच्या अड्ड्यात जादा वाहने असल्याने आता दुसऱ्या कारखान्याकडे ऊस जाणार असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ट्रॅक्टर शेतातून गावात पोहोचला की शेतकऱ्याला फोन करून त्याही कारखान्याचा अड्डा जाम असल्याचे सांगत तिसऱ्याच कारखान्याकडे ऊस नेला जातो. या सर्व प्रकारांकडे शांतपणे पाहत राहणे एवढेच शेतकऱ्यांच्या हातात असते. कारण दाद मागायची तरी कुणाकडे, हा प्रश्न आहेच. या सर्व प्रश्नांबाबत शेतकरी संघटनाही मूग गिळून गप्प असल्याचे चित्र आहे.

.............

पोहोच देणेच बंद

या सर्व प्रकारावर कडी म्हणजे आता अनेक कारखान्यांनी ऊस तुटल्यानंतर दिली जाणारी पोहोच बंद केली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांच्या या हातचलाखीत ऊस वजनात काही घोळ झाल्यास पोहोच नसल्यामुळे शेतकरी काहीही करू शकत नाही. १८ महिने राबून ऊस पिकवायचा अन्‌ तोडल्यानंतर कुठल्या कारखान्याकडे गेला,हे शोधत पिरायचे, एवढेच शेतकऱ्याचे आता काम राहिले आहे.

..............

या लुटीला शेतकरीच जबाबदार

शेतकऱ्यांची प्रत्येक टप्प्यावर लूट सुरू असली तरी ही परीस्थिती उद्‌भवण्यास शेतकरीच जबाबदार आहे. यड्रावसारख्या गावात असले प्रकार रोखण्यासाठी गतवर्षी समिती तयार करण्यात आली. शेतकऱ्यांची बैठक घेऊन ऊसतोडीसाठी पैसे न देण्याचे व त्याअनुषंगाने सुरू असलेले अघाेरी प्रकार खपवून न घेण्याचा ठराव केला जातो. असे ठराव करणे सर्व गावांना शक्य आहे. मात्र, रान मोकळे करण्याच्या अट्टाहासामुळे शेतकऱ्यांची चौफेर गळचेपी सुरू आहे.

............

कोट....

एकाच ट्रॅक्टर मालकाचे दोन किंवा तीन कारखान्यांकडे करार झाले असतील तर हे गंभीर आहे. कारखानदारांनी आपल्याकडे कोणत्या ट्रॅक्टरचे करार झाले आहेत याबाबत आपापसात शहानिशा करणे गरजेचे आहे.ऊस तोडीसाठी आमच्या कारखाना कार्यक्षेत्रात तरी पैसे मागितले जात नाहीत. कुठल्याही शेतकऱ्याबरोबर असा प्रकार घडल्यास त्यांनी कारखान्याकडे तक्रार करावी.

गणपतराव पाटील

अध्यक्ष, दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ

या प्रकरणात साखर सहसंचालकांनी लक्ष घालावे : जाधव

ऊसतोडीच्या या प्रकाराबाबत महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे सरचिटणीस काॅ. डॉ. सुभाष जाधव म्हणाले, यंदा काही साखर कारखान्यांनी क्रमपाळी पत्रक बासनात गुंडाळून ऊस कसाही आणून कारखान्यांना पुरवा,अशी भूमिका घेतली आहे. त्याचा गैरफायदा घेत काही वाहतूकदारांनी ऊस तोडणीसाठी चिटबाॅयना हाताशी धरून मोठी रक्कम उकळणे सुरू केले आहे. हा अतिशय निंदनीय प्रकार आहे. वास्तविक अशा अडचणीच्यावेळी कारखाना व्यवस्थापनाने काही पर्यायी व्यवस्था करून शेतकरयांचे हित जोपासले पाहिजे तसेच साखर सहसंचालकांनी यात तातडीने लक्ष घातले पाहिजे.

उद्याच्या अंकात : वाडे सारे विक्रीला,शेतकऱ्याला धत्तुरा

Web Title: Contract of the same tractor to 3 factories, farmers gossip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.