‘भोगावती’वर काँग्रेसचा मोर्चा
By Admin | Updated: November 28, 2014 23:43 IST2014-11-28T23:39:13+5:302014-11-28T23:43:48+5:30
मागण्यांचे निवेदन : मागण्यांचा येत्या १० दिवसांत विचार करावा, अन्यथा विविध आंदोलन

‘भोगावती’वर काँग्रेसचा मोर्चा
भोगावती : सन १३/१४ सालातील गाळप झालेल्या उसाला २ हजार ६५० रकमेतील उर्वरित दर फरक लवकरात लवकर द्यावा, वार्षिक सभेला खोटी हिशेबपत्रके सादर करून कारखाना नफ्यात आहे, हे दाखविणाऱ्या लेखापरीक्षकांवर कारवाई करावी, कामगारांना दिलेली बेकायदेशीर बढती व पगारवाढ, अतिरिक्त कामगार अशा विविध मागण्यांचे निवेदन कॉँग्रेसच्यावतीने मोर्चाने संचालक मंडळाला देण्यात आले.
निवेदनात पुढील मागण्या अशा : घसारा चुकीच्या पद्धतीने काढल्यामुळे कारखान्याला १० कोटींचे उत्पन्न चुकीचे दाखविले आहे. कारखान्याची निवडणूक गटनिहाय पद्धतीने स्वीकारायची झाल्यास विशेष साधारण सभा बोलावून निर्णय घ्यावा. कारखान्याच्या मालकीच्या पब्लिक स्कूलचा दर्जा ढासळला आहे, विधानसभा निवडणुकीत विरोधी प्रचार केलेल्या वाहनधारकांचे संचालक मंडळाने ऊस तोडणी ओढणी करार स्थगित ठेवले आहेत, ते तत्काळ दुरुस्त करावेत, गेल्या चार वर्षांतील आर्थिक परिस्थितीची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशा मागण्या केल्या आहेत. या मागण्यांचा येत्या १० दिवसांत विचार करावा, अन्यथा विविध आंदोलन हाती घेऊ, असा इशारा दिला आहे.
यावेळी मोेर्चासमोर ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे, माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, उदयसिंह पाटील-कौलवकर, बंडोपंत वाडकर, संजयसिंह पाटील यांनी भाषण केले. या मोर्चात माजी अध्यक्ष संभाजीराव चौगले, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रा. ए. डी. चौगले, शिवाजीराव तळेकर, धोंडिराम पाटील, गोपाळ पाटील, बी. जी. खांडेकर, बी. ए. पाटील, यशवंत सिद्दू पाटील, सुभाष पाटील, बाळासोा बरगे, आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
नोकरभरती नियमाप्रमाणे : धैर्यशील पाटील
इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट आॅफ इंडियाची मान्यता असलेल्या रिटन डाऊन व्हॅल्यू पद्धतीने मार्च १४ अखेर घसारा आकारणी काढली आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जादा आकारणी झालेला घसारा खर्च, घसारा फंडातून कमी केला आहे. मंजूर शेड्यूलप्रमाणे कामगार भरतीची अंमलबजावणी केली आहे, असे स्पष्टीकरण कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटील (कौलवकर) आणि उपाध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी पत्रकार बैठकीत केले आहे. भोगावती कारखान्यावर कॉँग्रेसच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यासंदर्भात त्यांनी ही माहिती दिली. केंद्र शासनाच्या एफआरपीप्रमाणे २५११ इतका दर दिलेला आहे. तसेच शासनाकडे दोन हजार ५४१ प्र. टन प्रमाणे अंतिम ऊस दर प्रस्ताव सादर केला आहे. ऊस दर नियंत्रण समितीच्या शिफारशीनुसार दर देऊ.
यावेळी कार्यकारी संचालक एस. एस. पाटील, नामदेवराव पाटील, संदीप पाटील, नंदकुमार पाटील, एकनाथ पाटील, पांडुरंग डोंगळे उपस्थित होते.