अपूर्ण कामे आठ दिवसांत पूर्ण करणार
By Admin | Updated: April 11, 2015 00:11 IST2015-04-11T00:01:00+5:302015-04-11T00:11:05+5:30
‘आयआरबी’चे महानगरपालिकेला पत्र : स्थायी समितीच्या बैठकीत माहिती

अपूर्ण कामे आठ दिवसांत पूर्ण करणार
कोल्हापूर : शहरातील रस्ते, दिवे, देखभाल आदी कामे अपूर्ण कामे येत्या आठ दिवसांत पूर्ण करत असल्याचे पत्र ‘आयआरबी’ने महापालिका प्रशासनाला दिले आहे, अशी माहिती प्रशासनाने शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दिली. त्यामुळे तांबट कमान रस्ता, रंकाळा येथील डी-मार्टच्या दारातील रस्त्यावर बसथांब्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती आदिल फरास होते.शहरातील अपूर्ण कामे पूर्ण करा अन्यथा ३० एप्रिलनंतर महापालिका आयआरबीच्या २५ कोटी रुपयांच्या अनामत रकमेतून ही कामे पूर्ण करेल, असे पत्र महापालिका प्रशासनाने ‘आयआरबी’ला १ एप्रिलला पाठविले होते. आठ दिवसांत या पत्रास उत्तर देत आयआरबीने पुढील आठवड्यापासून अपूर्ण कामे सुरू करत असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. त्याचबरोबर रस्ते प्रक ल्पाची मासिक देखभालही सुरू करत असल्याचे ‘आयआरबी’ने म्हटले आहे.
के.एम.टी. कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे पगार थकीत आहेत, यासाठी काय उपाययोजना केली आहे. २० एप्रिलपर्यंत एक पगार होईल. मात्र, नवीन गाड्या आल्याखेरीज के.एम.टी.ला ऊर्जितावस्था अशक्य असल्याची हतबलता के.एम.टी. प्रशासनाने यावेळी व्यक्त केली. के.एम.टी. कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांचे पगार झालेले नाहीत. प्रॉव्हिडंड फंडाससह विम्याची रक्कम अद्याप अदा केलेली नाही. के.एम.टी.चा गाडा कधी सुरळीत होणार, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. रोजंदारी वाहक व चालकांचे पगार दिले आहेत. बसची संख्या अपुरी असल्याने उत्पन्नावर परिणाम होत आहे.
येत्या महिन्यात २५पेक्षा अधिक नव्या बसेस येत आहेत. त्यानंतर के.एम.टी.च्या स्थितीत सुधारणा होईल, असे प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)
‘आयआरबी’ रस्ते प्रकल्पाची मासिक देखभालही करणार
महिन्याभरात २५पेक्षा अधिक नव्या बसेस आल्यानंतरच केएमटी सुधारणार