कोल्हापूर बनतेय स्पर्धा परीक्षेचे हब
By Admin | Updated: May 12, 2016 00:56 IST2016-05-12T00:41:09+5:302016-05-12T00:56:18+5:30
उत्तीर्णतेचे प्रमाण वाढले : वर्षाकाठी ५० हजार विद्यार्थी देतात परीक्षा

कोल्हापूर बनतेय स्पर्धा परीक्षेचे हब
कोल्हापूर : पालकांमधील जागृती, युवावर्गाला पटलेले महत्त्व आणि वाढलेली मार्गदर्शन केंद्रे यांमुळे स्पर्धा परीक्षांकडे कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाईचा कल वाढला आहे. वर्षाकाठी जिल्ह्यातून सुमारे ५० हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध स्पर्धा परीक्षा देत आहेत. या विद्यार्थ्यांनी जिद्दीला कष्टाची जोड देत या परीक्षांमध्ये यश मिळवून कोल्हापूरचे नाव उंचावले आहे. त्यामुळे कोल्हापूरची स्पर्धा परीक्षा हबच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
सन १९८५-८६ च्या दरम्यान कोल्हापूरमध्ये मास कॉपीचा प्रकार घडल्याने येथील परीक्षा केंद्र आयोगाने बंद केले. एक ते दीड वर्षानंतर आयोगाने पुन्हा या ठिकाणी परीक्षा केंद्र सुरू केले. त्यामुळे सन १९८८ पर्यंत यूपीएससी, एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांमध्ये कोल्हापूरकरांचे प्रमाण कमी होते. मात्र, यानंतर दीपा कोटणीस, भूषण गगराणी, विश्वास नांगरे-पाटील, मदन नागरगोजे, आदींनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून कोल्हापूरचा ठसा उमटविला. त्यांच्या यशाने प्रेरित होऊन अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळले. त्यांना स्थानिक पातळीवरच मिळणारे मार्गदर्शन, पालकांचे पाठबळ पूरक ठरले आहे. प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटर, शिवाजी विद्यापीठ, महाविद्यालये, विविध क्लासेस आणि लोकप्रतिनिधींनी स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करणारी केंद्रे सुरू केली आहेत. त्याचा परिणाम दरवर्षी स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांच्या संख्येसह त्यात यश मिळविणाऱ्यांची टक्केवारी वाढण्यावर झाला आहे. ‘एमपीएससी’तील पोलिस उपनिरीक्षक, तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, बँकिंग आॅफिसर, विक्रीकर निरीक्षक, आदी विविध पदांसाठी दरवर्षी सुमारे ४०, तर ‘यूपीएससी’ची साधारणत: दहा हजार
विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देत आहेत. गेल्या चार वर्षांत ही संख्या वर्षागणिक वाढली आहे.
आयोगाने वर्षातील परीक्षांचे निश्चित केलेले वेळापत्रक, नि:ष्षक्षपातीपणे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, विविध पदांसाठी ठराविक महिन्यांनी होणाऱ्या भरती प्रक्रियेमुळे स्पर्धा परीक्षांतील संधी वाढली आहे. या संधींचे रूपांतर यशात करण्यासाठी कोल्हापुरातील तरुणाई झटत आहे. यात यशस्वी होणाऱ्यांचे प्रमाण वर्षागणिक वाढत आहे. त्यातून स्पर्धा परीक्षेत कोल्हापुरातील गुणवत्तेची नवी ओळख निर्माण होत आहे.
पुणे-मुंबईच्या तोडीच्या व त्यांच्या तुलनेत कमी खर्चात मार्गदर्शनाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध होत असल्याने कोल्हापुरातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याद्वारे स्पर्धा परीक्षा हबच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू आहे. (प्रतिनिधी)
महाविद्यालये, लोकप्रतिनिधी व संस्थांनी स्पर्धा परीक्षांची केंद्रे स्थापन करण्यासह या परीक्षांबाबत जागृती केली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील यशस्वितांचा टक्का वाढत आहे. कृषी-औद्योगिक क्षेत्र असूनही कोल्हापुरात नोकरीची हमी मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे तरुणाई स्पर्धा परीक्षांकडे वळत आहे. - प्रा. विलास रणसुभे, माजी संचालक,
न्यू कॉलेज स्पर्धा परीक्षा केंद्र
पालक व विद्यार्थ्यांमधील जागृती, उपलब्ध झालेल्या मार्गदर्शनाच्या सुविधा यांमुळे कोल्हापुरातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यूपीएससीत यश मिळवित आहेत. त्यांचे प्रमाण वर्षागणिक वाढत आहे. एकूणच पाहता कोल्हापूर स्पर्धा परीक्षा हब होण्याच्या दिशेने आगेकूच करीत आहे.
- प्रा. जॉर्ज क्रूझ, मार्गदर्शक, स्पर्धा परीक्षा
वर्षाचा खर्च सुमारे ३० हजार
स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करणाऱ्या विविध संस्थांची केंद्रे कोल्हापुरात कार्यरत आहेत. त्यांच्याकडून परीक्षानिहाय सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत वर्ग घेतले जातात. दोन-दोन तासांच्या बॅच त्यांच्याकडून घेण्यात येतात. त्याचे शुल्क, नोटस्, पुस्तके, निवास, जेवण, आदी स्वरूपांतील एका विद्यार्थ्याचा एक वर्षाचा खर्च सुमारे ३० हजारांपर्यंत होतो.