सहकार चळवळ मोडून काढण्याचा डाव
By Admin | Updated: August 20, 2015 23:08 IST2015-08-20T23:08:13+5:302015-08-20T23:08:13+5:30
सुनील तटकरे : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर १४ सप्टेंबरपासून ‘जेल भरो’ आंदोलन

सहकार चळवळ मोडून काढण्याचा डाव
कोल्हापूर : राज्यातील भाजपचे सरकार हे शेतकरीविरोधी असून, सहकार चळवळ मोडून काढणे हाच कार्यक्रम घेऊन ते काम करीत आहे, असा घणाघाती आरोप गुरुवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. या बहिऱ्या सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.तटकरे म्हणाले, दहा महिन्यांपूर्वी राज्यात परिवर्तन होऊन १५ वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसवर विरोधात बसण्याची वेळ आली आहे. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर खचून न जाता पुन्हा नव्याने संघटना बांधण्यासाठी आपण राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात गाव आणि शहरातील पक्षाचे केडर मजबूत करण्याचा प्रयत्न राहणार आहे.राज्यातील भाजप सरकार शेतकरीविरोधी असून, सहकारी चळवळ मोडून काढण्याचा कार्यक्रम घेऊन ते काम करीत आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कार्यक्रम हाती घेऊन आंदोलन करणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण येथील शेतीविषयक व सामाजिक प्रश्न वेगवेगळे आहेत. ते समजून घेऊन पुढील दिशा ठरविली जाणार आहे. १४ व १५ सप्टेंबरला उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली या ठिकाणी ‘जेल भरो’ आंदोलन केले जाईल. गेल्या काही वर्षांत भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सरकारने ‘एसीबी’च्या माध्यमातून चौकशीही सुरू केली आहे. त्या चौकशीचे राष्ट्रवादीने स्वागत केले असून, सत्य काय आहे ते समोर येऊ दे, अशी पक्षाची भूमिका आहे. या चौकशीला सर्वच नेते सहकार्य करीत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाने त्यांना चांगल्या हेतूने मागासवर्गीय महामंडळावर संधी देऊन त्यांच्यावर विश्वास दाखविला. त्याला कदम यांनी छेद दिला. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पक्ष कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेची भूमिका दुटप्पी
सरकारमध्ये राहायचे आणि सरकारविरोधी भूमिका घ्यायची, अशी शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे, अशी टीका तटकरे यांनी केली. हिंमत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हानही तटकरे यांनी दिले.