कॉलेज कॅम्पस् गर्दीने फुलले...

By Admin | Updated: June 11, 2014 01:21 IST2014-06-11T01:19:47+5:302014-06-11T01:21:27+5:30

बारावी परीक्षेच्या गुणपत्रकांचे वाटप

College camps thronged ... | कॉलेज कॅम्पस् गर्दीने फुलले...

कॉलेज कॅम्पस् गर्दीने फुलले...

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेच्या गुणपत्रकांचे आज, मंगळवारी शहरासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये वाटप करण्यात आले. गुणपत्रिका घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी केलेल्या गर्दीने कॉलेज कॅम्पस बहरले होते. उद्या, बुधवारपासून शहरातील विविध महाविद्यालयांत प्रथम वर्षांच्या प्रवेशासाठीच्या अर्जांच्या विक्रीचा प्रारंभ होणार आहे.
बारावीचा ‘आॅनलाईन’ निकाल २ जूनला जाहीर झाला. या परीक्षेला कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतून १ लाख १४ हजार ६०३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ लाख ४ हजार ९०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयातर्फे सकाळी अकरा वाजता वितरण केंद्रांवरून जिल्ह्यातील महाविद्यालयांना गुणपत्रिका देण्यात आल्या. त्यानंतर संबंधित महाविद्यालयात दुपारी तीननंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले. गुणपत्रिका हातात मिळाल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिंनींच्या पुढील प्रवेशाबाबतच्या चर्चा रंगल्या होत्या. काही विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत गुणपत्रिका नेण्यासाठी महाविद्यालयात आले होते.
विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतींसाठी २१ जूनपर्यंत शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाकडे अर्ज करता येईल. यासाठी प्रति विषय ४०० रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी पहिल्यांदा उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकन करता येईल. (प्रतिनिधी)

 

Web Title: College camps thronged ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.