निर्मळ मनाचा स्पष्ट वक्ता--सदाशिवराव मंडलिक
By Admin | Updated: March 11, 2015 00:33 IST2015-03-10T23:47:09+5:302015-03-11T00:33:24+5:30
स्वच्छ पारदर्शी नेतृत्व

निर्मळ मनाचा स्पष्ट वक्ता--सदाशिवराव मंडलिक
सदाशिवराव मंडलिक यांनी अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. त्यांना वाचनाची सवय, अभ्यासाची बैठक होतीे. शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची मागणी करताना त्यांनी देशातील कृषी क्षेत्राचे बजेट किती आणि ते किती वाढवायला हवे याची माहिती आकडेवारीसह दिली होती. घोषणा करून न थांबता त्यासंबंधी संबंधित मंत्री, अधिकारी किंवा खाते यांच्याकडेही पाठपुरावा करण्याची त्यांना सवय होतीे. त्यांच्या रोखठोक स्वभावाने त्यांच्याबद्दल नेतृत्वाच्या मनात अनेकदा गैरसमज निर्माण झाले. २००४मधील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जेव्हा शरद पवार यांनी आपल्याला भाजपसह सर्व पर्याय खुले असल्याचे विधान केले, तेव्हा त्यास उघडपणे विरोध करणारे एकटे मंडलिकच होते. या विरोधामुळे त्यांच्या प्रतिमेला वेगळी उंची मिळाली. मंडलिक यांची कारकीर्द ऐन भरात असताना पत्नीचा आधार नियतीने हिरावून घेतला. हे दु:ख मोठे परंतु मंडलिक त्यातूनही उभे राहिले होते.
कोल्हापूर जिल्हा देशाच्या नकाशावर समृद्ध जिल्हा झाला पाहिजे, असा त्यांचा विचार होता. काळम्मावाडी योजना पूर्ण करून सिंचनाबरोबर कोल्हापूरचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नही सोडविण्यात ते यशस्वी झाले. पाटगाव व चिकोत्रा प्रकल्प पूर्ण करून महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातील जनतेलाही सिंचन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवले.
स्वच्छ पारदर्शी नेतृत्व
संघर्षाशिवाय सुतळीचा तोडाही मिळाला नाही, असे जाहीरपणे सांगणाऱ्या एका ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या मुलाने दुर्दम्य आशावाद, प्रचंड इच्छाशक्ती, उच्च नीतीमूल्यांची जोपासना करताना पराकोटीचा संघर्ष पचवत, विधानसभा आणि लोकसभेच्या सलग ४७ वर्षे अकरा निवडणुका लढवून ३५ वर्षे लोकप्रतिनिधी राहण्याचा विक्रम करत, खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी जनमानसावर आपल्या स्वच्छ व पारदर्शी कार्याचा ठसा उमटवला. वयाच्या पंचाहत्तरीतही विकासकामांच्या मजबूत धाग्यांनी जिल्ह्याच्या समाजकारणात व राजकारणात पन्नास वर्षे अवितरपणे कार्यमग्न असणारे हे बावनकशी नेतृत्व... राजकारणात सत्ता मिळविणे सोपे असते, मात्र ती टिकविणे खूप अवघड असते. सत्तेची नशा चढलेल्या भल्याभल्यांना जनतेने भुईसपाट केल्याची शेकडो उदाहरणे आहेत. खासदार मंडलिक यांनी ४७ वर्षे सत्तेचा सोपान बळकट केला. कार्यकर्त्यांना गृहीत धरून वाटचाल करताना घरादारांचा केलेला त्याग मंडलिकांच्या मोठेपणाचे बलस्थान होते. जय-पराजयापेक्षा लढत राहा, या त्यांच्या शिकवणीने कार्यकर्त्यांना जिल्हाभर मानाची पदे मिळाली. लोकसभेत गेल्यानंतर विधानसभेचा आपला उत्तराधिकारी ठरविताना त्यांनी स्वत:च्या मुलापेक्षा कार्यकर्त्याला संधी दिली. त्यातूनच हसन मुश्रीफ कागलचे आमदार झाले. गुरू-शिष्यांची ही जोडी राजकीयदृष्ट्या यशस्वी होत असतानाच तिला नजर लागली.
गुरू-शिष्यांचा संघर्ष अखेरपर्यंत राहिला.