स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: January 9, 2015 00:25 IST2015-01-09T00:21:08+5:302015-01-09T00:25:18+5:30
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : कचरा उठाव करताना जंतुसंसर्गाचा धोका

स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
एकनाथ पाटील - कोल्हापूर -शहरात पावला-पावलावर साचलेला कचरा उठाव करून कोल्हापूर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधीयुक्त, सडलेल्या कचऱ्याचा उठाव करताना हातांना ग्लोव्हज, चेहऱ्याला मास्क, पायांत गमबूट, अंगावर प्लास्टिकचा कोट अथवा गाऊन अशी कोणतीच स्वसंरक्षणार्थ साधनसामग्री जवळ नाही; त्यामुळे कर्मचाऱ्यांना जंतुसंसर्गाचा धोका उद्भवला असून, महापालिका प्रशासनाने मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.
अशी वस्तुस्थिती असली तरी महापालिका प्रशासन कर्मचाऱ्यांना स्वसंरक्षणार्थ साधनसामग्रीची पूर्तता केली असल्याचे सांगत आहे. मग ती प्रत्यक्षात कचरा उठाव करताना कर्मचाऱ्यांच्या अंगावर का दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरात दररोज १८० टन घनकचरा साचला जातो. महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाची कचरा उठावाची स्वतंत्र, सक्षम यंत्रणा कार्यरत आहे. त्यामध्ये कायमस्वरूपी १२००, तर रोजंदारी २५० कामगार आहेत. कायमस्वरूपी कामगारांना सरासरी १२ हजार रुपये महिना वेतन मिळते; तर रोजंदारी कामगारांना दिवसा २५० रुपये हजेरी दिली जाते. शहरात दररोज सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम राबविली जाते. या वेळेत सफाई कर्मचारी दिलेल्या भागात स्वच्छता करतात, तसेच साचलेला कचरा ट्रकमधून उचलत असतात. याशिवाय शहराच्या काही भागांत रात्री १० ते पहाटे २ वाजेपर्यंत अशाच प्रकारची मोहीम राबविली जाते. कचऱ्याची विल्हेवाट हा गंभीर प्रश्न असल्याने कचरा कोंडाळ्यांमुळे शहरवासीयांना डासांचा प्रादुर्भाव तसेच जंतुसंसर्ग होण्याची शक्यता ओळखून रोजच्या रोज कचऱ्याचा उठाव केला जातो. पुरुष कर्मचारी खाकी शर्ट-पॅँट, तर महिला निळ्या साड्यांमध्ये शहरात कचरा उठाव करताना दिसून येतात. त्यांच्याजवळ ग्लोव्हज, चेहऱ्याला मास्क, पायांत गमबूट, अंगावर प्लास्टिकचा कोट अथवा गाऊन अशी कोणतीच स्वसंरक्षणार्थ साधनसामग्री दिसून येत नाही. औषध फवारणी किंवा गटारे साफ करतानाही कर्मचाऱ्यांना श्वास रोखूनच साफसफाई करावी लागते. कचऱ्याच्या दुर्गंधीमधून तर कर्मचाऱ्यांना अनेक रोगरार्इंना सामोरे जावे लागते. महापालिकेने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी चालविलेला हा खेळ त्वरित थांबवावा, अशी मागणी होत आहे.