मंत्र्यांच्या प्रस्तावावर सायझिंगधारकांचे मतदान
By Admin | Updated: September 3, 2015 00:30 IST2015-09-03T00:30:08+5:302015-09-03T00:30:08+5:30
किमान वेतन प्रश्न : आज निकाल; सायझिंग असोसिएशनची आज पुन्हा बैठक

मंत्र्यांच्या प्रस्तावावर सायझिंगधारकांचे मतदान
इचलकरंजी : सायझिंग कामगारांना पूर्वीच्या किमान वेतनाच्या नियोजित परिपत्रकावरील साडेसात हजार रुपयांमध्ये ५०० रुपयांची वाढ देऊन कारखाने सुरू करण्याच्या वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रस्तावावर बुधवारी सायझिंगधारकांचे मतदान घेण्यात आले. त्याची मतमोजणी व निकाल आज, गुरुवारी जाहीर करण्यात येणार आहे.
सायझिंग कामगारांनी गेले दीड महिने केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रालयात वस्त्रोद्योगमंत्री पाटील यांच्याकडे कामगार संघटना व सायझिंगधारक कृती समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये सन २०१३ मध्ये शासनाने जाहीर केलेल्या किमान वेतनाच्या नियोजित परिपत्रकामधील साडेसात हजार रुपये वेतनामध्ये ५०० रुपयांची वाढ देऊन कारखाने सुरू करावेत. तसेच नवीन किमान वेतन ठरविण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमून या समितीने एक महिन्यात सुधारित किमान वेतनाचा निर्णय जाहीर करावा, असा प्रस्ताव वस्त्रोद्योगमंत्र्यांनी कामगार संघटना व सायझिंगधारकांसमोर ठेवला होता. तेव्हा सायझिंगधारकांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाबाबत बुधवारी सायझिंगधारकांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्याप्रमाणे बुधवारी रोटरी क्लबच्या सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत मतदान घेण्यात आले. उच्च न्यायालयाच्या सुनावणीबाबत आणि मंगळवारी मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमधील घडामोडींची माहिती कृती समितीचे संतोष कोळी आणि प्रकाश गौड यांनी दिली.
थोरात चौकामध्ये सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेच्यावतीने कामगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये कामगार नेते ए. बी. पाटील, सुभाष निकम, आनंदराव चव्हाण, मारुती जाधव, सूर्यकांत शेंडे यांची भाषणे झाली.
भाषणामध्ये मुंबईमधील मंगळवारच्या मंत्रालयातील बैठकीचा थोडक्यात वृत्तांत सांगण्यात आला. कामगारांचे किमान वेतन दहा हजार ५७३ रुपये असताना त्या मागे जाऊन सात हजार ५०० मध्ये ५०० रुपयांची वाढ घेण्याचा गैरवाजवी प्रस्ताव वस्त्रोद्योगमंत्री पाटील व आमदार हाळवणकर यांनी दिल्याबद्दल जोरदार टीका करण्यात आली.
तसेच याबाबत आज, गुरुवारच्या थोरात चौकातील सभेत सविस्तर आढावा घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घोषित करण्यात आला.