क्लोरीन गळतीने सहाजण गुदमरले
By Admin | Updated: July 30, 2015 00:54 IST2015-07-30T00:51:50+5:302015-07-30T00:54:08+5:30
दोघे गंभीर : कसबा बावडा ‘एसटीपी’ केंद्रातील घटना; पोलिसांकडून चौकशी सुरू

क्लोरीन गळतीने सहाजण गुदमरले
कसबा बावडा : येथील ‘झूम’ प्रकल्पाशेजारी असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या सांडपाणी केंद्रात (एसटीपी) बुधवारी सकाळी दहा वाजता सिलिंडरमधून क्लोरीन वायूची गळती झाली. या वायूची बाधा झाल्याने येथील सहा कर्मचारी अत्यवस्थ होऊन खाली कोसळले. यातील चार कर्मचाऱ्यांना तातडीने सीपीआरमध्ये, तर दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
अक्षय सदाशिव मगदूम (रा. फुलेवाडी), हेमंत सुधाकर काशीद (रा. शनिवार पेठ), विक्रम पंडित देवार्डे, भरत रामचंद्र इंगवले, विक्रम महादेव चौगले व राहुल प्रकाश भोसले (सर्व रा. कसबा बावडा) अशी क्लोरीनची बाधा झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. अक्षय मगदूम व राहुल भोसले यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुमारे ७६ दशलक्ष लिटर क्षमतेचा हा प्रकल्प विश्वा इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिस प्रा. लि. कंपनीकडे बी.ओ.टी. तत्त्वावर चालविण्यास आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यात येत होता. जयंती नाला येथून सांडपाणी आणून त्यावर विविध प्रक्रिया करून त्यानंतर हे पाणी नदीत सोडले जाते. पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन वायूचा वापर या ठिकाणी केला जातो. या प्रकल्पाजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये क्लोरीन वायूची भली मोठी सिलिंडर ठेवण्यात आली आहेत. त्यातील एका सिलिंडरला बुधवारी सकाळी गळती लागली. त्यामुळे क्लोरीन वायू या ठिकाणी पसरल्याने कर्मचाऱ्यांना या वायूची लगेचच बाधा झाली. येथे असणारे सहाही कर्मचारी चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. त्यांना श्वास घेण्यासाठी खूप त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी त्वरित रुग्णालयात हलविले. गळती लागलेले सिलिंडर तत्काळ के्रनच्या साह्याने सांडपाण्याच्या टाकीत टाकण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई, बुरहान नायकवडी, प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या क्षेत्र अधीक्षक वर्षा कदम यांनी पाहणी केली. यावेळी दिलीप देसाई यांनी विश्वा इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापक एस. नरेंद्र यांना खडे बोल सुनावले.
क्लोरीन वायूचा हवेत थर
क्लोरीन वायू हा काहीसा जाड असल्यामुळे तो हवेत लगेच मिसळत नाही. साधारण जमिनीपासून पाच फूट अंतरावर तो तसाच तरंगत राहतो. त्याच्या सहवासात ज्याचा संपर्क येतो, त्याला या वायूची लगेच बाधा होते.
‘ते’ सिलिंडर कोणाचे
घटनास्थळवरील सिलिंडर आपले नाही, ते महापालिकेचे आहे, असे विश्वा इन्फ्रास्ट्रक्चरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते आपले नसल्याचा इन्कार केला.
तपास सुरू
दरम्यान, या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नाही, परंतु तपास करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक आर. एस. मुंडे यांच्याकडे जबाबदारी दिली.
योग्य काळजी न घेतल्यानेच दुर्घटना...
महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (एसटीपी) पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. त्यासाठी तिथे क्लोरीन यार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे प्रत्येकी ९०० किलोग्रॅमची पाच सिलिंडर भरून ठेवलेली होती. ती सुरक्षित राहावीत अशी कोणतीही काळजी या केंद्राचा ठेका घेतलेल्या विश्वा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून घेण्यात आलेली नव्हती.
जुन्या गंजलेल्या सिलिंडरमधून सकाळी दहाच्या सुमारास ही गळती सुरू झाली. त्या परिसराजवळ नागरी वस्ती नाही, परंतु पुढील बाजूस काही वसाहती झाल्या आहेत. तेथील लोकांना जाऊन सावध करण्यात आले. सुरुवातीला कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून तोंडाला कापड बांधून ही गळती थांबविण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यांना त्यात यश आले नाही.
सिलिंडरचे वजन जास्त असल्याने ते त्यांना हलविता येईना. उलट गळती लागलेल्या क्लोरीन वायूचा त्रास झाला. त्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांना बोलाविण्यात आले. त्यांनी प्रयत्न करून हे सिलिंडर उचलून थेट शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीत नेऊन टाकले. पाण्यात क्लोरीन विरघळल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली.