टोलमुक्ती संदेशाने मुख्यमंत्री हैराण

By Admin | Updated: November 27, 2014 00:50 IST2014-11-27T00:36:06+5:302014-11-27T00:50:17+5:30

बॅटरी होतेये डिस्चार्ज : कोल्हापूरकरांचा नाद खुळा

Chief Minister Harsimoto toll free | टोलमुक्ती संदेशाने मुख्यमंत्री हैराण

टोलमुक्ती संदेशाने मुख्यमंत्री हैराण

कोल्हापूर : आजवर विविध आंदोलनांच्या माध्यमातून टोलमुक्तीसाठी लढा देणाऱ्या कोल्हापूरकरांनी आज, बुधवारी आंदोलनाचा अनोखा फंडा वापरला़ थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिस्ड कॉल आणि एसएमएस करून टोलमुक्तीचे गाऱ्हाणे मांडले़ कोल्हापूरकरांच्या या नाद खुळ्या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांच्या मोबाईलची ‘बॅटरी’ डिस्चार्ज झाली नाही तरच नवल!
रविवार पेठेत लागलेल्या एका अनोख्या बॅनरने अख्ख्या शहराचे आणि मीडियाचेही लक्ष वेधले़ ‘आपला एक एस.एम.एस. कोल्हापूर टोलमुक्त करू शकतो,’ असा फलक बिंदू चौकात लावण्यात आला होता़ त्याखाली मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोबाईल क्रमांकही देण्यात आला होता़ मग काय, दिसेल त्याने आपल्या मोबाईलवरून थेट मुख्यमंत्र्यांनाच ‘रिंग’ दिली़ तर अनेकांनी एसएमएस पाठवून टोलमुक्त करण्याची मागणी केली़ मुख्यमंत्र्यांनी कोणाचाही मोबाईल घेतला नाही. ‘लोकमत’नेही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ मात्र, त्यावेळी मोबाईल स्वीच आॅफ असल्याचे आढळून आले़
एकीकडे रंगणारा खडसे-ठाकरे वाद अन् दुसरीकडे शिवसेनेच्या सत्तासहभागाबाबत दिल्लीकडे लागलेले मुख्यमंत्र्यांचे लक्ष... अशा स्थितीत कधी काय ‘मेसेज’ येईल, याबाबत सतर्क असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांचा आजचा दिवस गाजवला तो कोल्हापूरकरांनी! या उपक्रमाबद्दल बोलताना संयोजक महेश ढवळे म्हणाले, कोल्हापूरचा टोल हटविल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. हा एक टप्पा असून, यासाठी आम्ही यावेळी सोशल मीडियाचा वापर करीत आहोत. शहरातील विविध ‘व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप’च्या माध्यमातून आम्ही या उपक्रमाबाबत जनजागृती करणार आहोत. एक लाख एसएमएस तरी आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठविणार आहोत. (प्रतिनिधी)


हजारो एसएमएस
दिवसभर येणाऱ्या हजारो एसएमएसमुळे त्यांच्या मोबाईलची ‘बॅटरी’ डिस्चार्ज झाली असावी़ खरे तर मुख्यमंत्री आज दिवसभर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमवेत होते़ त्यामुळे काही काळ त्यांचा मोबाईल बंदच होता़

Web Title: Chief Minister Harsimoto toll free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.