कागदपत्रांची पारदर्शकता तपासा
By Admin | Updated: December 2, 2014 00:14 IST2014-12-02T00:05:48+5:302014-12-02T00:14:18+5:30
भालचंद्र मुळे : अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

कागदपत्रांची पारदर्शकता तपासा
कोल्हापूर : जात प्रमाणपत्र हे प्रत्येक जातीच्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे आहे. जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या अर्जदाराच्या कागदपत्रांची पारदर्शकता तपासूनच संबंधितांना जात प्रमाणपत्र दिले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) उपमहाव्यवस्थापक प्रा. भालचंद्र मुळे यांनी केले.
शाहू स्मारक येथे ‘बार्टी’तर्फे जात प्रमाणपत्र देणाऱ्या कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यांतील सक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन येथील शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेत मुळे यांनी अधिकाऱ्यांना जात प्रमाणपत्र देताना घ्यावयाच्या दक्षतेसंबंधी मार्गदर्शन केले.
मुळे म्हणाले, संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिनांक आणि त्यासंबंधीचे पुरावे यांची खात्री करूनच संबंधित अर्जदाराला जात प्रमाणपत्र द्यावे. खऱ्या लाभार्थ्याला त्याच्या जातीचा फ ायदा घेण्याचा हक्क आहे; पण बोगस कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र काढणाऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी डोळसपणे काम करावे.
जातवैधता प्रमाणपत्रासंबंधी बोलताना प्रा. मुळे म्हणाले, गेल्या वर्षी राज्यातील १५ जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समित्यांनी १३ लाख प्रमाणपत्रे निकालात काढली आहेत. यावर्षी १ लाख ३ हजार प्रकरणे प्रलंबित असून, त्यांचा निपटारा करण्याचे काम प्रत्येक समितीकडून सुरू आहे. कोल्हापूरच्या जात पडताळणी समितीने २८ ते ३० नोव्हेंबरपर्यंत ४ हजार प्रकरणांचा निपटारा केला असून, त्यांचे वाटप सुरू आहे.
यावेळी अनुसूचित जातींतील धर्मांतरित नागरिक, कर्नाटकातील स्थलांतरित नागरिकांना तसेच त्यांच्या पाल्यांना जातीचे दाखले देताना येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांनी मांडल्या. याला उत्तर देताना मुळे यांनी केंद्र सरकारच्या जातीच्या सूचीचा आधार घेत संबंधितांना दाखले द्यावेत, असे सांगितले. या कार्यशाळेला कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील प्रांताधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रत्नागिरी जात पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव, ‘बार्टी’चे प्रकल्प संचालक अरुण बमनोटे, एस. एस. कापसे यांनी जात प्रमाणपत्र व त्याची पडताळणी यासंदर्भात मार्गदर्शन केले.
‘बार्टी’च्या सहायक प्रकल्प संचालक एल. डी. शेख यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेत जिल्हा प्रशासनातर्फे करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांनी प्रा. मुळे यांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)