जागा मिळविण्यापासूनच लबाडी
By Admin | Updated: February 27, 2015 00:20 IST2015-02-26T20:42:55+5:302015-02-27T00:20:41+5:30
‘एव्हीएच’ सुरुवातीपासूनच वादग्रस्त : प्रकल्प दाखविला ‘गडहिंग्लज’मध्ये, साकारला ‘चंदगड’ला

जागा मिळविण्यापासूनच लबाडी
राम मगदूम - गडहिंग्लज -निसर्गसंपन्न चंदगड तालुक्यातील पर्यावरणाला आणि जीवसृष्टीला हानिकारक असल्याच्या आरोपामुळे ‘एव्हीएच’ प्रकल्प वादग्रस्त ठरला आहे. दोन वर्षांपासून स्थानिक जनतेचा जोरदार विरोध असतानाही न्यायालयीन लढाईबरोबरच हरित लवादामध्येही आपल्या बाजूने निकाल मिळविण्यात कंपनी यशस्वी झाली. त्याचे एकमेव कारण म्हणजे प्रकल्पासाठी जागा मिळविण्यापासून उत्पादन सुरू करण्यापर्यंत झालेली ‘लबाडी’ आणि बड्या कंपनीला असणारा राजकीय वरदहस्त..!उद्योगपती जिंदाल यांच्या ‘जेएसडब्ल्यू’ गु्रपची ही कंपनी आहे. ग्रुपच्या एव्हीएच केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ‘कोल्टार डिस्टिलेशन प्लँट’साठी ६ डिसेंबर २०१० रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे कोल्हापूर जिल्ह्यातील ‘हलकर्णी’ एमआयडीसीमधील जागेची मागणी करण्यात आली.‘कोल्टार’वर प्रक्रिया करणारा हा प्रकल्प ‘घातक’ रसायने निर्माण करणारा असल्यामुळे त्यास हलकर्णी एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करून देता येत नाही. तथापि, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण खात्याचा ना हरकत दाखला आणल्यास कंपनीच्या अर्जाचा विचार केला जाईल, असे ‘एमआयडीसी’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कंपनीला कळविले. त्यानंतर प्रस्तावित प्रकल्प घातक रसायने तयार करणारा नाही, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना लेखी कळविले.२३ डिसेंबर २०१० रोजी हा प्रकल्प घातक रसायने निर्माण करणारा नसल्याचे पत्र कंपनीने एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबरलाच ‘प्रदूषण नियंत्रण मंडळाने’ या कंपनीला जागा देण्यास हरकत नसल्याने ना हरकत दाखला केवळ एकाच दिवसात दिला. या दाखल्यातच खरी ‘गडबड’ आहे.
‘एव्हीएच’ कंपनीला गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी एमआयडीसीतील जागा उपलब्ध करून देण्यास हरकत नाही, असे पत्र प्रदूषण मंडळाच्या सदस्य सचिवांनी दिले. मात्र, मुळातच ‘गडहिंग्लज’ तालुक्यातील हलकर्णीमध्ये ‘एमआयडीसी’च नसून ती आहे, ‘चंदगड’ तालुक्यातील हलकर्णीत. याच पत्राच्या आधारे कंपनीने पश्चिम घाटात समाविष्ट असणाऱ्या चंदगड तालुक्यात ‘एव्हीएच’साठी जागा मिळविली. आंदोलकांचा आक्षेप व वादाचे मूळ कारण इथेच आहे.
जागतिक वारसामध्ये समाविष्ट असणाऱ्या पश्चिम घाटातील चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील ‘एमआयडीसी’त जिंदाल उद्योग समूहातर्फे उभारण्यात आलेला ‘एव्हीएच’ केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा ‘कोल्टार प्रक्रिया’ प्रकल्प उभारणीपासूनच वादग्रस्त ठरला. निसर्गसंपन्न चंदगडच्या पर्यावरणाला व जीवसृष्टीला तो घातक असल्याचा प्रकल्पाविरोधी आंदोलकांचा आक्षेप आजही कायम आहे. त्यामुळेच दोन वर्षांपासून सुरू झालेल्या रस्त्यावरच्या आंदोलनाबरोबरच शासनस्तरावरील संघर्ष व न्यायालयीन लढाईदेखील नव्याने सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘एव्हीएच’ची लढाई आजपासून.....
‘एव्हीएच’विषयी
कोल्टार पीचवर प्रक्रिया करून अॅल्युमिनियम, ग्राफाईट, टायर उत्पादने व बांधकाम क्षेत्रासाठी बायंडर पीच, इप्रिगेशन पीच, कार्बेन ब्लॅक वायू , वॉश आॅईल, क्रे ओसोट आॅईल, पीच क्रे ओसोट मिक्चर, रिफार्इंड नेपथॅलिन, आदी कोल्टार रसायनाच्या देशातील अग्रेसर पुरवठादार होण्याच्या एकमेव उद्देशाने स्थापन झालेली कंपनी.
घटनाक्रम
२७ आॅगस्ट २०१० : कंपनीचा प्रारंभ
६ डिसेंबर २०१० : ‘एमआयडीसी’कडे जागेची मागणी
२३ डिसेंबर २०१० : ‘प्रदूषण’चा दाखल आणण्याची सूचना
२४ डिसेंबर २०१० : ‘प्रदूषण’कडून ना-हरकत.
२० मार्च २०१२ : ‘पर्यावरण’ची ना-हरकत.
१४ आॅगस्ट २०१२ : जागेचा ताबा घेतला.