चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावर दावा दाखल करावाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:24 IST2021-04-27T04:24:58+5:302021-04-27T04:24:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भाजपच्या सांगण्यावरूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयने छापेमारी केल्याचा आरोप आपण केला ...

चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावर दावा दाखल करावाच
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भाजपच्या सांगण्यावरूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयने छापेमारी केल्याचा आरोप आपण केला होता. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शंभर कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचे वक्तव्य केले. आपले त्यांना सांगणे आहे, त्यांनी वेळ दवडू नये, आजच दावा दाखल करावा, असे उघड आव्हान ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, अंबानींच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटकातील मुख्य सूत्रधाराचे नाव जाहीर करावे, या प्रकणात जे आरोप आहेत, त्यांच्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांची चौकशीच कशी होऊ शकते? राज्य सरकार अस्थिर करण्याचे कारस्थान भाजपकडून सुरू असल्याचे आपण म्हटले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी दाव्याची धमकी दिली आहे, त्यांनी दावा दाखल करावाच, दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊदे. गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीतील आराेपाबाबत आपण चंद्रकांत पाटील यांच्यावर शंभर काेटींचा दावा दाखल केला आहे, तो जिल्हा सत्र न्यायालयात सुरु असल्याची आठवणही मंत्री मुश्रीफ यांनी करून दिली.
सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ‘एसआयटी’ने तपास पूर्ण करत आणला असताना तो ‘एनआयए’कडे दिला. आताही स्फोटकांच्या तपासाचा मुंबई पोलिसांनी छडा लावला हाेता, त्यातील नावे बाहेर येणार होती, तोपर्यंत हाही तपास ‘एनआयए’कडे दिला. या देशात चालले तरी काय? तपास देऊन काय? हाती लागले, सुशांतसिंग व वाझे प्रकरणात एनआयए पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला.
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतींना चिंता
देशात कोरोनाचे संकट भयावह झाले आहे. अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे येत आहेत तरीही या मंडळींना राजकारण सुचते. केंद्र सरकार गेले सहा महिने काय करत हाेते? असा प्रश्न खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीनीच केला आहे. आता एकमेकांवर टीका करत बसण्याची ही वेळ नाही. राज्य सरकार लस व रेमडेसिविर खरेदीचे ग्लोबल टेंडर काढणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
कायदा बदलण्यापेक्षा साखरेची दरवाढच योग्य
एफआरपीचा कायदा बदलणे कठीण आहे. त्यापेक्षा केंद्र सरकारने साखरेच्या किमान दरात वाढ करून तो प्रतिक्विंटल ३,४०० रूपये करणे अधिक उचित ठरेल. साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्रकल्प उभारणीबाबत २ मेनंतर बैठक घेणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.