कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीचे चित्र पालटणार : चंद्रकांतदादा पाटील
By Admin | Updated: July 16, 2017 18:59 IST2017-07-16T18:59:47+5:302017-07-16T18:59:47+5:30
आॅटोमाईझ सोलर बेस ठिबक प्रणाली कृषी क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरेल

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीचे चित्र पालटणार : चंद्रकांतदादा पाटील
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १५ : शेतीचे उत्पादन वाढून जोपर्यंत उत्पन्नात वाढ होत नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही. यासाठी जिल्ह्यातील शेतीचे चित्र बदलून येथील शेतीविकास देशात अधोरेखित व्हावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे केले. जैन इरिगेशनने विकसित केलेली आॅटोमाईझ सोलर बेस ठिबक प्रणाली कागलमध्ये १५० एकरांवर राबविण्यात येणार असून, राज्य आणि देशासाठी हा प्रयोग मार्गदर्शक ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
ताराबाई पार्क येथील रेसिडेन्सी क्लब येथे शेतीतील प्रगत तंत्रज्ञानाच्या विविध विषयांवर सादरीकरण व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, कणेरी मठाचे स्वामी अदृश काडसिद्धेश्वर, मुपिन काडसिद्धेश्वर, जैन इरिगेशनचे अभय जैन, गोकुळ दूध संघाचे संचालक बाबा देसाई, केळी पीकतज्ज्ञ के. बी. पाटील, अभिजित जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, शेतीमध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन भरघोस वाढविता येणे शक्य आहे. त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. जैन इरिगेशनकडील आॅटोमाईझ सोलर बेस ठिबक प्रणालीचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीचे चित्र पालटण्यासाठी उपलब्ध जमिनीवर उत्पादन दुप्पट व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल. यापुढे कृषी विभागाच्या यंत्रणांचा नियमितपणे आढावा घेतला जाईल. अभय जैन म्हणाले, बंदिस्त पाईपलाईनद्वारेच पाणी उपसा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या उपसा पद्धतीमुळे पाणी वाया जाणार नाही व पाट पद्धतीने लागणाऱ्या पाण्यापेक्षा कमी पाण्यात अधिक क्षेत्र सिंचनाखाली येईल.
के. बी. पाटील म्हणाले, उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर शेतीला विज्ञान समजून काम केले पाहिजे. पिकांच्या आवश्यकतेनुसार आणि वेळेनुसार पिकाचे व्यवस्थापन केले तर उत्पादन दुपटीचे स्वप्न निश्चित पूर्ण करणे शक्य आहे. तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कृषिक्षेत्रही याला अपवाद नाही. अभिजित जोशी यांनी उपसा ठिबक सिंचन जैन इरिगेशनची एकात्मिक प्रणाली, आॅटोमेटिक इरिगेशन यंत्रणा याबाबत सादरीकरण केले. यावेळी ‘गुरुदत्त शुगर्स’चे माधवराव घाटगे, अनिल यादव, प्रताप कोंडेकर यांच्यासह प्रयोगशील शेतकरी उपस्थित होते.
कागल तालुक्यात राज्यातील पहिला ठिबक प्रकल्प
उत्पादन वाढले की शेतकरी श्रीमंत होतो. त्यासाठी शेतकऱ्यांचे समूह करण्यात येतील. याचीच सुरुवात समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदशर्नाखाली कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचा गट करून १५० एकरांवर महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जेवर चालणारा ग्रुप आॅटोमाईझ सोलर बेस ठिबक प्रकल्प सुरू करण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यात किमान असे २५ समूह तयार करण्यात यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कृषी अधीक्षकांना पालकमंत्र्यांचा डोस
पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा कृषी विभागाच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत तुम्ही काय केलेत? कृषी विभाग म्हणून तुमची काय जबाबदारी आहे की नाही? अशी विचारणा करीत, मी कृषिमंत्री नसल्याने मला रिपोर्टिंग करत नाही का? अशी विचारणा करीत मी कृषिमंत्री नसलो तरी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, हे दाखवावे लागेल, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी जिल्हा कृृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांना डोस दिला. तसेच दर महिन्याला कृषी विभागाची आढावा बैठक घ्या, अशी सूचनाही केली.
‘ठिबक’ला उत्तेजन देण्यासाठी कंपन्यांकडून निधी घेणार
ठिबकच्या माध्यमातून खते आणि कीटकनाशकेही देता येतात. त्यामुळे विजेशिवाय चालणारी ही प्रणाली शेतकऱ्यांसाठी उपकारक आहे. ठिबक प्रणालीला उत्तेजन देण्यासाठी ती एकरी ५० हजार रुपये खर्चात उपलब्ध व्हावी यासाठी उद्योग जगतातील मोठमोठ्या कंपन्यांचा ‘सीएसआर’ मिळविण्यात येईल. कंपन्यांकडून दोन टक्के खर्च हा सामाजिक कामांवर केला जातो, त्याचा उपयोग या ठिकाणी होईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
शेतीप्रगतीशिवाय देशाचा विकास दर वाढणार नाही
शेतीतील उत्पादनवाढीसाठी विविध प्रयोग जिल्ह्यात करण्यात येत असून धारवाड, मालेगाव, खानापूर या ठिकाणी नैसर्गिक कीटकनाशकांचा प्रयोग करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होत आहेत, असे सांगून शेतीत प्रगती झाल्याशिवाय देशाचा विकासदर वाढणार नाही, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
रामथल येथे २५ हेक्टरवर ठिबकचा प्रकल्प
कर्नाटकातील रामथल येथे २५ हेक्टर जमिनीवर ठिबक सिंचनाचा प्रकल्प राबविण्यात येत असून, ही कोरडवाहू शेती आता बागायती झाली आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्रातही काम करता येणे शक्य आहे, असे जैन यांनी सांगितले.
शेती उद्योगाला प्रक्रिया उद्योगाची जोड द्यावी
शेती उद्योगाला प्रक्रिया उद्योगाची जोड देण्याची आवश्यकता के. बी. पाटील यांनी अधोरेखित केली. त्याचबरोबर टिशू कल्चर केळी, टिशू कल्चर डाळिंब, अल्ट्राहाय डेन्सीपी हंबा, पेरू, ऊस, आदी पिकांबाबत माहिती देऊन हवामानातील बदल, तापमानवाढ, पाणी, जमिनीची सुपीकता, अन्नघटकांची उपलब्धता यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.