‘चंदगड’मध्ये विधानसभेचे ‘पडघम’!
By Admin | Updated: June 11, 2016 00:53 IST2016-06-11T00:21:43+5:302016-06-11T00:53:25+5:30
सामना बहुरंगीच होणार : सारेच लागले तयारीला; पक्ष-गटांची मोर्चेबांधणी गतिमान

‘चंदगड’मध्ये विधानसभेचे ‘पडघम’!
राम मगदूम -- गडहिंग्लज आगामी विधानसभा निवडणुकीला अजून साडेतीन वर्षांचा अवकाश आहे. तरीदेखील चंदगड विधानसभा मतदारसंघात आतापासूनच ‘विधानसभे’चे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सर्व मंडळी तयारीला लागली आहेत. किंबहुना, राजकीय पक्षांसह सर्व गटांची मोर्चेबांधणी गतिमान झाली आहे. त्यामुळे गतवेळच्या निवडणुकीप्रमाणेच आगामी निवडणूकदेखील बहुरंगीच होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीत ‘स्वाभिमानी’ व ‘शिवसेना’ वगळता चंदगड, गडहिंंग्लज व आजरा तालुक्यांतील सर्वच नेतेमंडळींनी संध्यादेवी कुपेकरांना साथ दिली. मात्र, त्यानंतरची सार्वत्रिक निवडणूक बहुरंगी आणि चुरशीची झाली. जिल्ह्यात गाजलेली ती निवडणूक आणि त्यानंतर जिल्ह्यासह गडहिंग्लज विभागातील बदललेली राजकीय समीकरणे लक्षात घेतल्यास आगामी निवडणुकीतील लढतीचे चित्रदेखील स्पष्ट होते.
गतवेळी ‘राष्ट्रवादी’च्या विद्यमान आमदार संध्यादेवी यांच्याविरोधात त्यांचे सख्खे पुतणे संग्रामसिंह यांनी ‘जनसुराज्य’तर्फे, तर त्यांचे
सहकारी अप्पी पाटील यांनी ‘अपक्ष’ निवडणूक लढविली. ‘स्वाभिमानी’चे राजेंद्र गड्यान्नावरही ताकदीने
रिंगणात उतरले होते. मात्र, त्यांचेच तत्कालीन सहकारी नितीन पाटील यांनी बंडखोरी केली. माजी आमदार नरसिंगराव पाटील यांना शिवसेनेतर्फे, तर माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांना काँगे्रसतर्फे नशीब आजमावावे लागले. अंतिम टप्प्यात गोपाळराव पाटील यांनी मेहुणे नरसिंगराव यांना पाठिंबा दिला. तथापि, बहुरंगी लढतीचा फायदा संध्यादेवी यांनाच झाला.
आगामी निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’तर्फे लढण्यासाठी स्व. कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्यावेळी ‘जनसुराज्य’तर्फे लढलेल्या संग्रामसिंह कुपेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीतर्फे बाभूळकर, तर सेनेतर्फे संग्रामसिंंह यांची
उमेदवारी निश्चित मानली जाते. ‘स्वाभिमानी’चे गड्यान्नावरही पुन्हा रिंगणात असतील.
‘भाजप’वासी झालेले गोपाळरावदेखील पुन्हा नशीब आजमावतील. नरसिंगराव यांच्या ‘भूमिके’ची प्रतीक्षा असली तरी
त्यांचा निर्णय संजय मंडलिक यांच्या ‘भूमिकेवर’ अवलंबून राहील. भरमूअण्णादेखील अखेरचा डाव म्हणून रिंगणात उतरण्याची
शक्यता असली तरी ते कुठल्या पक्षातर्फे लढणार यासाठी वाट पहावी लागेल.
अप्पींना ‘ताकद’ मिळणार ?
केवळ संघटन कौशल्य आणि ‘गोकाक’चे पाहुणे ‘जारकीहोळी बंधू’च्या पाठबळावर अप्पी पाटील यांनी पहिल्याच प्रयत्नात गतवेळी तिसऱ्या क्रमांकाची तब्बल २८ हजार मते घेतली. तेदेखील येत्या निवडणुकीत ताकदीने उतरण्याची शक्यता आहे. जारकीहोळींच्या कंपनीलाच दौलत चालवायला देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला असून, ‘दौलत’ला सहकार्य करण्याची ग्वाही सहकारमंत्री चंद्रकांतदादांनी चंदगडच्या मेळाव्यात केली आहे. त्यामुळे नवीन चेहरा आणि इलेटिव्ह मेरीट म्हणून येत्या निवडणुकीत अप्पींनाच ताकद मिळण्याची शक्यता आहे.
ताई आणि अण्णांचीही तयारी !
कुणाही मोठ्या नेत्याचा सहभाग नसतानाही केवळ जनतेच्या पाठबळावर एकहाती संघर्ष करून एव्हीएचसारखी बलाढ्य कंपनी हद्दपार केल्यानंतर विजयोत्सव साजरा करून नंदातार्इंनी तर आपल्या प्रयत्नामुळेच चंदगड तालुका सुजलाम्-सुफलाम् झाल्याचा दावा करीत भरमूअण्णांनीही कृतज्ञता मेळावा घेऊन आगामी निवडणुकीतील उमेदवारीची झलक दाखविली. त्यापाठोपाठ झालेल्या ‘विकास पर्व’ मेळाव्यात गोपाळरावांनीही ताकद दाखवली आहे. अन्य छावण्यांमध्ये शांतता असली तरी आगामी निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.