पूरबुडीत उसाचे कारखान्यास आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST2021-09-22T04:27:41+5:302021-09-22T04:27:41+5:30

घनशाम कुंभार यड्राव: नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरात पूर्णपणे बुडालेल्या उसाला फुटवे फुटल्याने त्याचे गाळप करणे साखर कारखान्यास फायद्याचे ठरत ...

Challenge to submerged sugarcane factory | पूरबुडीत उसाचे कारखान्यास आव्हान

पूरबुडीत उसाचे कारखान्यास आव्हान

घनशाम कुंभार

यड्राव: नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरात पूर्णपणे बुडालेल्या उसाला फुटवे फुटल्याने त्याचे गाळप करणे साखर कारखान्यास फायद्याचे ठरत नसले तरी ज्या ऊस उत्पादकांनी साखर कारखान्याकडे उसाच्या नोंदी दिल्या आहेत. तो ऊस गाळपास आणणे कारखान्याची जबाबदारी असते. पूर्ण पूरबुडीत उसाच्या गाळपाचे नियोजन करून त्याचे गाळप करण्याचे आव्हान साखर कारखान्यांपुढे आहे.

नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरामध्ये शिरोळ तालुक्यातील १७ हजार हेक्टर ऊस पिकास फटका बसला आहे. यातील २० टक्के म्हणजे ३४०० हेक्टर ऊस पूर्णपणे बुडाला असून उभ्या ऊस पिकाचा सर्व पाला खराब होतो. उसाच्या पाल्यामध्ये सत्व नसल्याने त्याची वाढ होत नाही. तर उसाच्या डोळ्यांना कोंब फुटले आहेत. त्या नवीन कोंबाना वाढ होण्यास त्या उसातील जीवनसत्त्वे मिळत असल्याने त्या उसाच्या वजनाबरोबर साखरेचे प्रमाणही घटते याचा फटका शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना सहन करावा लागतो.ज्या ऊस उत्पादकांनी साखर कारखान्यांना ऊस क्षेत्राची नोंद केली असेल त्या शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेणे कारखान्यास बंधनकारक आहे. पण ज्यांनी ऊस कोणत्याही कारखान्यास नोंद केला नाही अशा शेतकऱ्यांच्या पुढे उसाचे काय करायचे हा प्रश्न उभा आहे.

मागील वर्षीच्या जून ते ऑक्टोबरपासून लावलेल्या नोंदीचा पंधरापेक्षा जादा कांड्या असलेला ऊस कारखान्यास पाठविण्यास शेतकरी प्रयत्नशील राहतो. तर जानेवारी ते मार्चपर्यंत लागण केलेल्या पंधरापेक्षा कमी कांड्याचा पूरबुडीत ऊस शेतातून काढून टाकण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय नाही.

प्रत्येक साखर कारखाना चांगली रिकव्हरी येण्यासाठी परिपूर्ण वाढ झालेला ८६०३२, १०००१ व यासारख्या विशिष्ट जातींच्या दर्जेदार उसाचे गाळप करतो. यामुळे पुढील हंगामात ऊस उत्पादकांना चांगला दर देता येतो, याकरिता ते प्रयत्नशील असतात. म्हणून आपापल्या कारखान्याकडे नोंद असलेला पूरबुडीत ऊस गाळपास आणल्यास रिकव्हरीमध्ये फरक पडू शकतो व त्याचा तोटा सहन करावा लागतो. यासाठी पूरबुडीत ऊस गाळपाचे नियोजन करणे साखर कारखान्यांपुढे आव्हान आहे.

------------------------

कोट -

शेतकऱ्याने ऊस लावून सोळा ते वीस महिने उसाचे जतन केले असते. त्यातच आलेल्या नैसर्गिक महापूर संकटामुळे ऊस बाधित होतो. ज्या कारखान्यांना ऊस नोंद दिला आहे तो सर्व ऊस कारखान्यांना घ्यावाच लागेल. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही.

- सागर संभूशेटे, जिल्हाध्यक्ष युवा आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना

फोटो - २१०९२०२१-जेएवाय-०२, ०३

फोटो ओळ - ०२) पूरबुडीत उसाचा पाला खराब झाल्याने उसाच्या डोळ्यांना कोंब फुटत आहेत. यामुळे उसाचे क्षेत्र वाळल्यासारखे दिसते.

०३) पूर्ण पूरबुडीत उसाच्या डोळ्यांना कोंब फुटले आहेत.

Web Title: Challenge to submerged sugarcane factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.